Sunday 12 December 2021

१९७१: पूर्वेकडच्या आकाशावर भारतीय वायुसेनेचे वर्चस्व

पूर्व पाकिस्तानातून आलेल्या शरणार्थींना स्वगृही सुखरूप परत पाठवणे हेच भारताचे उद्दिष्ट होते. त्यासाठीच, 'मुक्तीबाहिनी' ला भारतीय सैन्य गुप्तपणे मदत करीत असले तरीही ते उघडपणे पूर्व पाकिस्तानात घुसले नव्हते.

पाकिस्तानच्या हवाईदलाने व पायदळाने पश्चिमेकडून भारतावर हल्ला केल्यानंतर भारतानेही पश्चिम पाकिस्तानवर प्रतिहल्ला केला खरा, परंतु, 'पूर्व पाकिस्तानला 'किलो फ्लाईट'चा दणका' बसल्यानंतरच भारताने युद्धाची औपचारिक घोषणा केली होती.

औपचारिकपणे युद्ध सुरु झाल्यानंतर मात्र, भारतीय वायुसेनेने काहीही हातचे राखले नाही. त्या रात्रीपासूनच आपल्या कॅनबेरा बॉम्बर विमानांनी पूर्व पाकिस्तानातल्या तेजगांव आणि कुर्मिटोला येथील पाकिस्तानी हवाईतळांवर हल्ले सुरु केले. 

"पूर्वेकडच्या सुरक्षेची किल्ली पश्चिम आघाडीवरच सापडेल" ही पाकिस्तानची युद्धनीती असली तरी  भारताने मात्र, "पूर्वेकडे झटपट कारवाई आणि पश्चिमेकडे टुकूटुकू लढाई" हे सूत्र अवलंबले होते.

पूर्वेकडील पाकिस्तानी हवाईदलाला समूळ संपवायच्या आणि तेथील संपूर्ण आकाशावर वर्चस्व मिळवण्याच्या इराद्याने, ४ डिसेंबरच्या पहाटेही आपले हवाई प्रतिहल्ले सुरूच राहिले. 

कारण?

'हवाईक्षमता ज्याची खरी, तोच पृथ्वीवर राज्य करी'!

पूर्वेकडील पाकिस्तानी हवाईदलाला जमिनीवरच 'झोपवणे', म्हणजेच हवाई हल्ले करण्याची त्यांची क्षमताच संपवणे, हे भारतीय वायुसेनेचे पहिले लक्ष्य होते. भारतीय वायुसेनेने संपूर्ण हवाई वर्चस्व मिळवल्यानंतर, समुद्रमार्गे येणारी पाकिस्तानी रसद-कुमक रोखणे आपल्या नौदलाला, आणि ढाक्यापर्यंत मुसंडी मारणे आपल्या पायदळाला सोपे जाणार होते.

पूर्व पाकिस्तानातील लष्करी ठाण्यांवर हल्ले करीत असताना, आसपासच्या नागरिकांना काहीही इजा होऊ न देण्याची संपूर्ण खबरदारी भारतीय वायुसेनेने घेतली होती. पाकिस्तानी हवाईतळांवर हल्ले करून, पाक विमानांना हेरून नष्ट करणे, आणि तेथील हवाई यंत्रणा निकामी करणे, हे काम सोपे मात्र अजिबात नव्हते.

पाकिस्तानी हवाईदलानेही त्यांची विमाने -अगदी आपण ठेवली होती तशीच- सहजी दृष्टीस पडणार नाहीत अशा प्रकारे ठिकठिकाणी विखरून ठेवली होती. त्यांना हेरणे आणि नष्ट करणे म्हणजे, शब्दशः, 'गवताच्या गंजीतली टाचणी शोधण्याइतकेच' कठीण होते. 

किंबहुना त्याहूनही अवघड!

कल्पना करा की, शत्रूचा अतिशय कडक सुरक्षा बंदोबस्त असलेल्या विमानतळावर, अगदी कमी उंचीवरून विमान उडवीत, ताशी ९०० किलोमीटर वेगाने, म्हणजेच दर सेकंदाला अडीचशे मीटर अंतर तुम्ही कापत आहात.  अशा प्रकारे उडत असतानाच, तुम्हाला डावी-उजवीकडे पाहत, जमिनीवरचे लक्ष्य शोधत जायचे आहे. त्याच वेळी, वरच्या बाजूलाही नजर ठेवायची आहे, कारण तुमच्या मागावर आलेल्या शत्रूच्या फायटर विमानाचे लक्ष्य बनण्याची तुमची इच्छा नक्कीच नसणार! 

हे सगळे करीत असतानाच, जमिनीवरून शत्रूच्या विमानवेधी तोफा तुमच्यावर नेम धरून, दर सेकंदाला ४० मिलीमीटर व्यासाचे दोन बॉम्ब फेकत असणारच आहेत! 

कशी वाटते ही कल्पना?

४ डिसेंबरपासून, अगदी अशाच परिस्थितीत हल्ले करीत, आपल्या विमानांनी शत्रूची पुष्कळशी हवाई यंत्रणा व काही विमाने नष्ट केली आणि शत्रूला बेजार केले. परंतु, अजूनही पाक विमाने हवेत उडत होती आणि आपल्या विमानांवर हल्ले करीतच होती. म्हणजेच, आपल्याला शंभर टक्के यश मिळाले नव्हते. त्यामुळे, भारतीय वायुसेनेने वेगळी विमाने व शस्त्रे, आणि तीही अगदी निराळ्याच पद्धतीने वापरण्याचा निर्णय घेतला.

मिग-२१ ही अतिशय वेगवान विमाने, मुख्यत्वे आपल्या हद्दीत शिरलेल्या शत्रूच्या विमानांचा पाठलाग करून त्यांना पाडण्याच्या कामी वापरली जात असत. जमिनीवर बॉम्ब टाकण्यासाठी आपली हंटर आणि कॅनबेरा विमाने जेंव्हा जात, त्यावेळी त्यांना पाडण्याच्या हेतूने येणाऱ्या सेबर विमानांपासून त्यांचा बचाव करणे, हेही मिग-२१ विमानांचे काम असे. क्वचितप्रसंगी, जमिनीवर मारा करण्यासाठी असलेली रॉकेट्सदेखील मिग-२१ विमाने सोबत नेत असत.

१९७१च्या युद्धात प्रथमच, पाचशे किलोचे प्रत्येकी दोन-दोन बॉम्ब तेजगाव विमानतळावर टाकण्याचे काम चार मिग-२१ विमानांच्या तुकडीवर सोपवले गेले. 

एकेका विमानाला अगदी कमी उंचीवरून, पण अतिशय वेगाने, शत्रूच्या धावपट्टीकडे तिरप्या दिशेने उडत जावे लागणार होते. इतर तीन विमानांनी अशाच प्रकारे वेगवेगळ्या दिशांनी उडत येऊन मारा करायचा होता. शत्रूच्या विमानवेधी तोफांना झटपट दिशा बदलून विमानांचा वेध घेता येऊ नये, यासाठी ही रणनीती आवश्यक होती. 

परंतु, या रणनीतीचे काही तोटेदेखील होतेच. हे बॉम्बहल्ले काहीसे अंदाधुंद केले जाणार असल्याने अचूक मारा होण्याची शाश्वती नव्हती. त्यामुळे कदाचित, काही दिवस, किंवा काही आठवडेसुद्धा, सतत व मोठया संख्येने मारा करीत राहण्याची गरज होती. आणि नेमके तेच आपल्याला नको होते. 

दोन वेगवेगळ्या आघाड्यांवर आपले सैन्य शत्रूचा सामना करीत होते. त्यामुळे, पूर्वेकडे मुसंडी मारीत निघालेल्या आपल्या पायदळाला लवकरात लवकर ढाक्यापर्यंत पोहोचता आले असते तरच युद्ध निर्णायकपणे जिंकता येणार होते. हे लक्षात घेऊन, भारतीय वायुसेनेने एक धाडसी निर्णय घेतला.

मिग विमानांनी तेजगांव विमानतळावर केलेला हल्ला 
(ग्रुप कॅप्टन देब गोहाइन यांनी रेखाटलेले कल्पनाचित्र)  

मिग-२१ विमानांनी कमी उंचीवरून, धावपट्टीकडे तिरप्या दिशेने न उडता, खूप उंचावरून अचानक ६० अंशाच्या कोनात खाली सूर मारत यायचे आणि धावपट्टीच्या वरूनच उडत बॉम्ब टाकायचे ठरले. यामुळे आपल्या माऱ्यामध्ये अधिक अचूकता येणार होती, पण आपल्या विमानांना असलेला धोका कैक पटींनी वाढणार होता. 

एकाच दिशेने, एकापाठोपाठ धावपट्टीच्या वरच येत असलेल्या या चारी विमानांचा वेध घेणे शत्रूच्या विमानवेधी तोफांना खूपच सोपे होते.   

आपल्या विमानांना आणि आणि वैमानिकांच्या जीवांना असलेला हा गंभीर धोका पत्करूनही, अशाच प्रकारे हल्ले करायचे ठरले!

चारी मिग-२१ विमानांनी अतिशय विस्मयकारकरीत्या अचूक बॉम्ब टाकून तेजगांवच्या धावपट्टीवर आठ मोठमोठे खड्डे पाडल्याने ती धावपट्टी वापरता येणे अशक्य झाले.

युद्ध संपल्यानंतर, आपल्या मिग वैमानिकांनी केलेली ही कामगिरी जेंव्हा संपूर्ण जगाने  बघितली, तेंव्हा मिग विमाने बनवणाऱ्या रशियन लोकांनीच नव्हे, तर पाकिस्तानचा परममित्र असलेल्या अमेरिकेनेही आश्चर्याने अक्षरशः तोंडात बोटे घातली!

परंतु, युद्धात असे काही घडण्याची शक्यता पाकिस्तान्यांनीही लक्षात घेऊन ठेवली असावी. त्या धावपट्टीवरून सेबर विमानांना जेमतेम उड्डाण करता येईल इतपत दुरुस्ती, पाकिस्तान्यांनी अक्षरशः दिवसरात्र खपत, २४ तासाच्या आत करून टाकली. त्याकाळी रात्रीच्या अंधारात अचूक मारा करता येणे अशक्य होते. पण, पहाटे-पहाटे मिग विमाने हल्ला करण्यासाठी येणार याची त्यांना जवळ-जवळ खात्रीच होती.

परंतु, त्यांच्या ध्यानी-मनी-स्वप्नीही नसलेली कारवाई भारतीय वायुसेनेने केली. 

मिग-२१ विमानांनी पहाटे-पहाटे नव्हे, तर पहाटेपूर्वीच हल्ला केला आणि पाकिस्तान्यांनी दुरुस्त केलेली धावपट्टी बॉम्ब टाकून संपूर्णपणे नादुरुस्त करून टाकली!

आपल्या विमानांनी अचूक बॉम्ब टाकून, तेजगांव धावपट्टीची जी अवस्था केली होती ती पाहिल्यानंतर, पाकिस्तानी हवाईदलाचा एक वरिष्ठ अधिकारी हताशपणे म्हणाला होता, "पूर्वेकडचे पाकिस्तानी हवाईदल संपले असेच म्हणावे लागेल. आता मात्र पूर्व पाकिस्तानची धडगत नाही!"

भारतीय मिग-२१ विमानांनी उध्वस्त केलेली धावपट्टी 

या घटनेनंतर भारतीय वायुसेनेने अगदी दिवसा-ढवळ्यासुद्धा हवाई हल्ले करीत, पूर्व पाकिस्तानातील संपूर्ण हवाई यंत्रणा नष्ट केली आणि सामरिक इतिहासात 'न भूतो,न भविष्यति' अशा एका शौर्यगाथेची नोंद केली. 

भारतीय वायुसेनेने शत्रूवर केवळ 'हवाई वर्चस्व' मिळवले नव्हते, तर पूर्व पाकिस्तानवर आपले 'हवाई साम्राज्य'च स्थापन केले होते!

आता मात्र पूर्व पाकिस्तानचा पाडाव अटळ होता!


मूळ इंग्रजी लेखक: विंग कमांडर अविनाश चिकटे (सेवानिवृत्त) www.avinashchikte.com 
हा लेख खालील लिंकवर प्रकाशित झाला आहे. 

मराठी अनुवाद: कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ९४२२८७०२९४

(लेखातील सर्व छायाचित्रे indiatimes.com च्या सौजन्याने)

10 comments:

  1. Kudos to the Indian Air Force.
    Thanks to you sir for I got an opportunity to read such brave moments of Air force.

    ReplyDelete
  2. या अशा धाडसी प्रसंगावर आधारित मराठीत चित्रपट निर्मिती होणे आवश्यक आहे. असे प्रसंग नुसते वाचले तरी डोळ्यांसमोर तो प्रसंग निर्माण होतो . मनात देशप्रेमाचे स्फुरण निर्माण होते . समाजाच्या सर्व विशेजतः तरुण पिढीला त्यामुळे प्रेरणा निर्माण होऊ शकते.

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी योग्य विचार!
      धन्यवाद, मॅडम! 🙏

      Delete
  3. भारतीय हवाई दलाच्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा! नेहेमी प्रमाणे सुंदर लेख आणि सुंदर शब्दांकन!

    ReplyDelete
  4. Felt proud to read sir. Nice coverage

    ReplyDelete
  5. Gaining air superiority was great achivement & must have helped our ground forces movement in a big way.

    ReplyDelete