Monday 20 December 2021

१९७१: लोंगेवालाचा 'खयाली पुलाव'!

१९७१ मध्ये पाकिस्तान शिजवीत असलेला 'खयाली पुलाव' किती 'खमंग' होता याचा विचार आज केला की खूपच करमणूक होते. काही नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, एक पाकिस्तानी जनरलसाहेब असे म्हणाले होते की, "आम्ही लोंगेवालामध्ये नाश्ता करू, दुपारचे भोजन रामगढमध्ये घेऊ, आणि रात्रीचा खाना जैसलमेरमध्ये!"

लोंगेवालामध्ये नाश्ता, भोजन रामगढमध्ये, आणि रात्रीचा खाना जैसलमेरमध्ये! 

पाकिस्तानने ३ डिसेंबर १९७१ संध्याकाळच्या हवाई हल्ल्यांसाठी निवडलेल्या ठिकाणांमध्ये जोधपूरचा समावेश होता पण जैसलमेरच्या हवाई तळाकडे पाकिस्तानने लक्षही दिले नव्हते. कदाचित पाकिस्तानी हवाईदलाचा असा कयास असावा की, जैसलमेरला भारताचे एकही फायटर विमान नसणार, आणि म्हणूनच त्यावर शक्ती खर्चण्यात अर्थच नाही. त्यांच्या पायदळाचाही कदाचित तोच अंदाज होता.

पण असे अंदाज बांधताना, हवाई शक्तीचे एक महत्वाचे बलस्थान लक्षात घ्यायला पाकिस्तान विसरला, आणि ते म्हणजे 'वेग'!

कोणत्याही हवाईतळावरून आकाशात झेप घ्यायला आणि इच्छित ठिकाणी पोहोचायला विमानांना कितीसा वेळ लागतो? फक्त काही तास! 

पाकिस्तानी हवाईदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हे ठाऊकच नव्हते असे कसे म्हणायचे? तरीही त्यांनी त्यांच्या पायदळाला योग्य सल्ला का दिला नसावा, हे एक कोडेच आहे.

कदाचित, त्यांच्या योजनेप्रमाणे -नव्हे, स्वप्नरंजनाप्रमाणे- त्यांची फौज एका दिवसातच जैसलमेर काबीज करणार असल्याने, तेथील धावपट्टी त्यांना स्वतःला आयती वापरायला मिळावी म्हणून त्यावर हल्ला केला नसेल!

त्यांच्या विचारांची दिशा काहीही असली तरी वस्तुस्थिती अशी होती की, ४ डिसेंबरच्या रात्री लोंगेवालावर हल्ला करणार असल्याची खबर पाकिस्तानी पायदळाने स्वतःच्याच  हवाईदलाला २ डिसेंबरपर्यंत दिली नव्हती!

अर्थातच, २ डिसेंबरला पाकिस्तानी हवाईदलाने कानावर हात ठेवत सांगितले की, तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला नसल्याने, ४ डिसेंबरच्या हल्ल्यादरम्यान पाकिस्तानी पायदळाला हवाई सुरक्षा मिळू शकणार नाही!

नोकरशाहीच्या लाल फितीचे यापेक्षा समर्पक उदाहरण आणखी कुठे सापडेल?

पश्चिमेकडची अधिकाधिक जमीन बळकावायची पाक युद्धनीती होती. त्यामागचा हेतू असा, की युद्धानंतर होणाऱ्या तहाच्या वाटाघाटींमध्ये हवी तशी घासाघीस करून, पूर्वेकडे भारताने जिंकलेला भूभाग तो परत मिळवू शकला असता. अशी आक्रमक नीती अवलंबायचे जर ठरलेले होते, तर दोन दिवसांची पूर्वसूचना मिळूनही, पायदळाच्या आक्रमणादरम्यान "हवाई सुरक्षा पुरवण्यास आम्ही असमर्थ आहोत", असे त्यांचे हवाईदल खुशाल कसे सांगते? 

आणि इतके सगळे होऊनदेखील, पायदळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठरवलेली योजना - किंवा पाहिलेली स्वप्नसृष्टी - त्यांना इतकी महत्वाची वाटली की त्यांनी चक्क हवाई सुरक्षेविनाच या युद्धात उतरायचे ठरवले! 

असे करताना पुन्हा युद्धनीतीचे तेच महत्वाचे सूत्र पाकिस्तानी विसरले, 

'हवाई क्षमता ज्याची खरी, तोच पृथ्वीवर राज्य करी!'

पाकिस्तानी सैन्यदलांच्या या अज्ञानाला, किंवा त्यांच्या पोकळ उद्दामपणाला काय म्हणावे हेच समजत नाही.  

याउलट, पूर्वेकडच्या आकाशावर भारतीय वायुसेनेने मिळवलेले वर्चस्व लक्षात घेतले तर सहज समजते की, आपल्या पायदळाला, केवळ ११ दिवसात, पूर्व पाकिस्तानाची राजधानी ढाक्यापर्यंत मुसंडी कोणत्या जोरावर मारता आली असेल!

जैसलमेर येथे भारतीय वायुसेनेचा एक सीमावर्ती तळ होता. तेथील धावपट्टी युद्धासाठी सदैव सज्ज ठेवण्याकरता काही संसाधने आणि थोडे वायुसैनिक तेथे तैनात होते.

परंतु, युद्धाला तोंड फुटण्याच्या काही दिवस आधी, वायुदलाने चार हंटर विमानेदेखील जैसलमेरला आणून ठेवलेली होती. हेतू असा की, भविष्यात जमिनीवरील किंवा हवाई हल्ल्याच्या प्रसंगीही ती उपयोगी पडावी. 

मुळातच, लवचिकता हा हवाई शक्तीचा एक अंगीभूत गुणआहे. म्हणूनच, जमिनी किंवा हवाई, यापैकी कोणत्याही हल्ल्याला तोंड देण्यासाठी आवश्यक ते बदल विमानांच्या शस्त्रांमध्ये करणे, म्हणजे अक्षरशः काही मिनिटांचे काम असते.

लोंगेवालाच्या आघाडीवर, २५०० सैनिक आणि ४० रणगाड्यांसह आक्रमण करणाऱ्या पाकिस्तानी पायदळाचा मुकाबला करायला  तेथील भारतीय चौकीवर फक्त १२० सैनिक आणि आणि एकमेव रणगाडा-विरोधी तोफ होती!

केवळ संख्याबळाचा विचार केल्यास, ही स्थिती पाकिस्तानसाठी अतिशय अनुकूल होती असे कोणीही म्हणेल. परंतु, पाकिस्तान एक गोष्ट लक्षात घ्यायला विसरला. 

ती गोष्ट म्हणजे भारताची हवाई शक्ति, जी युद्धाचे पारडे भारताच्या बाजूला फिरवू शकली असती.  

आणि पारडे तसेच फिरले!

लोंगेवाला चौकीवर ४ डिसेंबरच्या संध्याकाळी तैनात असलेल्या आपल्या मूठभर शूर जवानांनी एकीकडे भारतीय वायुसेनेकडे हवाई सुरक्षेची मागणी केली, आणि दुसरीकडे पाकिस्तानी आक्रमणाला मोठया बहादुरीने संपूर्ण रात्रभर थोपवून धरले.

त्या रात्रीच हवाई हल्ले करण्याच्या भारतीय वायुसेनेच्या अक्षमतेबद्दल, त्या लढाईच्या अनुषंगाने पुष्कळ काही लिहिले-बोलले गेले आहे.

१९७१ साली जे तंत्रज्ञान उपलब्ध होते त्याच्या बळावर रात्रीच्या अंधारात हवाई हल्ले करता येत नव्हते. शिवाय, वाळवंटात इतस्ततः विखुरलेल्या रणगाड्यांवर आणि भारतीय जवानांसोबत हातघाईची लढाई लढत असलेल्या पाकिस्तानी सैनिकांवर रात्री हवाई हल्ला करण्याचा प्रश्नच नव्हता. एखादा बॉम्ब चुकून-माकून आपल्याच जवानांवर पडला असता तर?

४ डिसेंबरच्या रात्री भारतीय वायुसेनेची हंटर विमाने इंधन भरून, आणि दारूगोळा सोबत घेऊन, उड्डाणाच्या तयारीत जैसलमेरच्या हवाई तळावर उभी होती. ५ डिसेंबरला भल्या पहाटे आपल्या विमानांनी भरारी घेतली आणि ती लोंगेवालाच्या युद्धभूमीवर पोहोचली. 

पायदळाच्या तोफखान्याची गोळाबारी अचूक व्हावी म्हणून, 'एयर ऑब्सर्व्हेशन पोस्ट' (Air OP) नावाचा, तोफखान्याचाच एक टेहळणी अधिकारी नेमलेला असतो. एखाद्या उंच ठिकाणावरून, अथवा शक्य तितके शत्रूसैन्याच्या जवळ पोहोचून टेहळणी करीत, शत्रूच्या ठिकाणाचे नेमके दिशानिर्देश तो Air OP आपल्या रेडिओवरून सांगत असतो. प्रत्यक्ष लक्ष्यापासून अनेक मैल लांब असलेल्या तोफा त्या निर्देशांच्या आधारे दिशा ठरवून शत्रूवर अचूक मारा करतात. 

विमानातून मारा करणाऱ्या वैमानिकांसाठी नेमके हेच काम फॉरवर्ड एयर कंट्रोलर (FAC) नावाचा एक अधिकारी करीत असतो.  

५ डिसेंबरच्या पहाटे, पायदळाच्या Air OP ने आपल्या छोट्या 'कृषक' विमानातून उडत, वायुसेनेच्या विमानांसाठी FAC ची भूमिका बजावली. त्याच्या दिशानिर्देशानुसार उंचावरून सूर मारत, आपल्या हंटर विमानांनी रॉकेट आणि ३० मिलीमीटर बंदुकांनी मारा करीत, पाकिस्तानी रणगाड्यांना अक्षरशः सळो की पळो करून सोडले.

लोंगेवालाच्या युद्धाचे कल्पनाचित्र 
[चित्रकार ग्रुप कॅप्टन देब गोहाईन]

जैसलमेरला एकूण चारच हंटर विमाने तैनात होती. शत्रूवर हल्ले करायचे, जैसलमेरला परतून विमानात पुन्हा इंधन व दारूगोळा भरायचा, आणि पुन्हा युद्धभूमीवर पोहोचायचे, असा क्रम त्या विमानांनी आळीपाळीने चालू ठेवला आणि शत्रूला दिवसभरात अजिबात उसंत मिळू दिली नाही.

'दे माय धरणी ठाय' अशी अवस्था झालेले पाकिस्तानी रणगाडे आणि ट्र्क लोंगेवालाच्या वाळवंटामध्ये दिवसभर सैरावैरा धावत राहिले, पण व्यर्थ. पाकिस्तानी विमाने किंवा विमानवेधी तोफांकडून काहीही प्रतिकार होत नसल्याने, आपल्या 'हंटर' विमानांच्या वैमानिकांनी अक्षरशः तळ्यातली बदके टिपावीत तशी पाकिस्तानी रणगाड्यांची शिकार केली!

'हंटर' विमानाच्या कॅमेरामधून टिपलेली रणगाड्याची 'शिकार'!

कुठेही न थांबता जैसलमेरला पोहोचायची स्वप्ने पाकिस्तानने पाहिलेली असल्याने त्यांचे रणगाडे आपल्यासोबत जास्तीचा तेलसाठा घेऊन निघालेले होते. त्यामुळे भारतीय विमानांनी त्यांना लावलेल्या आगीत तेल ओतण्याचे काम त्यांनी स्वतःच करून टाकले!

लोंगेवालाच्या लढाईत भारताने दोन सैनिक गमावले. पण, वायुसेना आणि पायदळाने परस्पर समन्वय साधत पाकिस्तानी सैन्याची अक्षरशः ससेहोलपट केली. पाकिस्तानचे ३४ रणगाडे, शंभराहून अधिक वाहने, आणि २०० सैनिक या युद्धात बळी पडले. 

वाळवंटात सैरावैरा धावणाऱ्या पाकिस्तानी रणगाड्यांच्या 'पाऊलखुणा'
 

त्या दिवशी पाकिस्तानचा एक रेडिओ संदेश आपल्या यंत्रणेने टिपला होता. त्यात म्हटले होते, 

"भारतीय विमानांनी थैमान घातले आहे. एक विमान जाते न जाते, तोच दुसरे येते आणि वीसेक मिनिटे आग ओकते. आमचे चाळीस टक्के रणगाडे आणि सैनिक खलास तरी झाले आहेत किंवा जखमी वा निकामी झालेले आहेत. आता आम्हाला पुढे जाणे अतिशय कठीण आहे. आमच्या रक्षणासाठी त्वरित विमाने पाठवा. अन्यथा येथून सुरक्षित माघारी येणेही आम्हाला अशक्य होऊन बसेल." 

त्याच रात्री, राजस्थान सेक्टरमधील आपल्या पायदळाच्या जनरलसाहेबांनी जैसलमेर हवाईतळाच्या प्रमुखांना पाठवलेल्या संदेशात म्हटले होते, 

"आज आपण एकमेकांना दिलेली साथ अप्रतिम होती. तुमच्या वैमानिकांनी अतिशय अचूक नेमबाजी करून पाकिस्तानी रणगाड्यांना नष्ट केल्यामुळेच त्यांच्या आक्रमणाची धार बोथट झाली. तुमच्या वैमानिकांना माझे आणि माझ्या सैनिकांचे विशेष आभार आणि कौतुक कळवा. हार्दिक अभिनंदन!"

लोंगेवालापासून जैसलमेरचे अंतर, अगदी युद्धकाळातदेखील, एका दिवसात कापणे सहज शक्य आहे. पण, त्या शक्यतेला शेख चिल्लीचे, म्हणजेच पाकिस्तानचे, दिवास्वप्न ठरवू शकणारी क गोष्ट भारताकडे होती, आणि ती म्हणजे 'हवाई ताकद'!

युद्धशास्त्राचा एक मूलभूत धडा विसरल्याची किंमत पाकिस्तानला मोजावीच लागली. 

"लोंगेवालामध्ये नाश्ता, रामगढमध्ये भोजन आणि जैसलमेरमध्ये रात्रीची मेजवानी" चाखायची स्वप्ने पाहणारे पाकिस्तानी स्वतःच्याच जळत्या रणगाड्यांच्या तंदूरमध्ये भाजून निघाले! 

त्या आगीत त्यांची मग्रुरी तर खाक झालीच पण भविष्यात ताकदेखील फुंकून पिण्याची अक्कल त्यांना निश्चितच आली असणार!

मला अनेकदा लोक विचारतात, "या युद्धातील भारतीय विजयाचे श्रेय कोणाला द्यावे? पायदळाला की वायुसेनेला? 

उत्तर अगदी सोपे आहे. 

"भारतीय पायदळ आणि वायुसेना या दोघांमधील परस्पर समन्वयाला!"

जरासा गमतीचा भाग म्हणून, वाळवंटात लढल्या गेलेल्या त्या लढाईचे श्रेय नौसेनेलाही देता येईल, कारण उंटाला वाळवंटातले जहाज मानतातच! 

अर्थात, पाकिस्तानच्या लढाऊ सामग्रीच्या अरबी समुद्रातून होणाऱ्या वाहतुकीची भारतीय नौसेनेने जी कोंडी केली त्यामुळे अप्रत्यक्षपणे या लढाईवर प्रभाव पडला असे मात्र निश्चित म्हणता येईल. 

त्यामुळे, "भारताच्या तिन्ही सशस्त्र दलांनी मिळून भारताला विजय मिळवून दिला", हेच म्हणणे योग्य!

भारतालाच नव्हे, तर बांगलादेशाच्या नागरिकांनादेखील आपल्या सेनादलांनी विजय मिळवून दिला!

कारण पश्चिमेकडील युद्धात जर आपण राजस्थानचा भूभाग गमावला असता तर तहामध्ये त्याच्या बदल्यात आपल्याला कदाचित संपूर्ण बांगलादेश पाकिस्तानला परत द्यावा लागू शकला असता!


मूळ इंग्रजी लेखक: विंग कमांडर अविनाश चिकटे (सेवानिवृत्त) www.avinashchikte.com 
हा लेख खालील लिंकवर प्रकाशित झाला आहे. 

मराठी अनुवाद: कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ९४२२८७०२९४

(लेखातील सर्व छायाचित्रे indiatimes.com च्या सौजन्याने)

Sunday 12 December 2021

१९७१: पूर्वेकडच्या आकाशावर भारतीय वायुसेनेचे वर्चस्व

पूर्व पाकिस्तानातून आलेल्या शरणार्थींना स्वगृही सुखरूप परत पाठवणे हेच भारताचे उद्दिष्ट होते. त्यासाठीच, 'मुक्तीबाहिनी' ला भारतीय सैन्य गुप्तपणे मदत करीत असले तरीही ते उघडपणे पूर्व पाकिस्तानात घुसले नव्हते.

पाकिस्तानच्या हवाईदलाने व पायदळाने पश्चिमेकडून भारतावर हल्ला केल्यानंतर भारतानेही पश्चिम पाकिस्तानवर प्रतिहल्ला केला खरा, परंतु, 'पूर्व पाकिस्तानला 'किलो फ्लाईट'चा दणका' बसल्यानंतरच भारताने युद्धाची औपचारिक घोषणा केली होती.

औपचारिकपणे युद्ध सुरु झाल्यानंतर मात्र, भारतीय वायुसेनेने काहीही हातचे राखले नाही. त्या रात्रीपासूनच आपल्या कॅनबेरा बॉम्बर विमानांनी पूर्व पाकिस्तानातल्या तेजगांव आणि कुर्मिटोला येथील पाकिस्तानी हवाईतळांवर हल्ले सुरु केले. 

"पूर्वेकडच्या सुरक्षेची किल्ली पश्चिम आघाडीवरच सापडेल" ही पाकिस्तानची युद्धनीती असली तरी  भारताने मात्र, "पूर्वेकडे झटपट कारवाई आणि पश्चिमेकडे टुकूटुकू लढाई" हे सूत्र अवलंबले होते.

पूर्वेकडील पाकिस्तानी हवाईदलाला समूळ संपवायच्या आणि तेथील संपूर्ण आकाशावर वर्चस्व मिळवण्याच्या इराद्याने, ४ डिसेंबरच्या पहाटेही आपले हवाई प्रतिहल्ले सुरूच राहिले. 

कारण?

'हवाईक्षमता ज्याची खरी, तोच पृथ्वीवर राज्य करी'!

पूर्वेकडील पाकिस्तानी हवाईदलाला जमिनीवरच 'झोपवणे', म्हणजेच हवाई हल्ले करण्याची त्यांची क्षमताच संपवणे, हे भारतीय वायुसेनेचे पहिले लक्ष्य होते. भारतीय वायुसेनेने संपूर्ण हवाई वर्चस्व मिळवल्यानंतर, समुद्रमार्गे येणारी पाकिस्तानी रसद-कुमक रोखणे आपल्या नौदलाला, आणि ढाक्यापर्यंत मुसंडी मारणे आपल्या पायदळाला सोपे जाणार होते.

पूर्व पाकिस्तानातील लष्करी ठाण्यांवर हल्ले करीत असताना, आसपासच्या नागरिकांना काहीही इजा होऊ न देण्याची संपूर्ण खबरदारी भारतीय वायुसेनेने घेतली होती. पाकिस्तानी हवाईतळांवर हल्ले करून, पाक विमानांना हेरून नष्ट करणे, आणि तेथील हवाई यंत्रणा निकामी करणे, हे काम सोपे मात्र अजिबात नव्हते.

पाकिस्तानी हवाईदलानेही त्यांची विमाने -अगदी आपण ठेवली होती तशीच- सहजी दृष्टीस पडणार नाहीत अशा प्रकारे ठिकठिकाणी विखरून ठेवली होती. त्यांना हेरणे आणि नष्ट करणे म्हणजे, शब्दशः, 'गवताच्या गंजीतली टाचणी शोधण्याइतकेच' कठीण होते. 

किंबहुना त्याहूनही अवघड!

कल्पना करा की, शत्रूचा अतिशय कडक सुरक्षा बंदोबस्त असलेल्या विमानतळावर, अगदी कमी उंचीवरून विमान उडवीत, ताशी ९०० किलोमीटर वेगाने, म्हणजेच दर सेकंदाला अडीचशे मीटर अंतर तुम्ही कापत आहात.  अशा प्रकारे उडत असतानाच, तुम्हाला डावी-उजवीकडे पाहत, जमिनीवरचे लक्ष्य शोधत जायचे आहे. त्याच वेळी, वरच्या बाजूलाही नजर ठेवायची आहे, कारण तुमच्या मागावर आलेल्या शत्रूच्या फायटर विमानाचे लक्ष्य बनण्याची तुमची इच्छा नक्कीच नसणार! 

हे सगळे करीत असतानाच, जमिनीवरून शत्रूच्या विमानवेधी तोफा तुमच्यावर नेम धरून, दर सेकंदाला ४० मिलीमीटर व्यासाचे दोन बॉम्ब फेकत असणारच आहेत! 

कशी वाटते ही कल्पना?

४ डिसेंबरपासून, अगदी अशाच परिस्थितीत हल्ले करीत, आपल्या विमानांनी शत्रूची पुष्कळशी हवाई यंत्रणा व काही विमाने नष्ट केली आणि शत्रूला बेजार केले. परंतु, अजूनही पाक विमाने हवेत उडत होती आणि आपल्या विमानांवर हल्ले करीतच होती. म्हणजेच, आपल्याला शंभर टक्के यश मिळाले नव्हते. त्यामुळे, भारतीय वायुसेनेने वेगळी विमाने व शस्त्रे, आणि तीही अगदी निराळ्याच पद्धतीने वापरण्याचा निर्णय घेतला.

मिग-२१ ही अतिशय वेगवान विमाने, मुख्यत्वे आपल्या हद्दीत शिरलेल्या शत्रूच्या विमानांचा पाठलाग करून त्यांना पाडण्याच्या कामी वापरली जात असत. जमिनीवर बॉम्ब टाकण्यासाठी आपली हंटर आणि कॅनबेरा विमाने जेंव्हा जात, त्यावेळी त्यांना पाडण्याच्या हेतूने येणाऱ्या सेबर विमानांपासून त्यांचा बचाव करणे, हेही मिग-२१ विमानांचे काम असे. क्वचितप्रसंगी, जमिनीवर मारा करण्यासाठी असलेली रॉकेट्सदेखील मिग-२१ विमाने सोबत नेत असत.

१९७१च्या युद्धात प्रथमच, पाचशे किलोचे प्रत्येकी दोन-दोन बॉम्ब तेजगाव विमानतळावर टाकण्याचे काम चार मिग-२१ विमानांच्या तुकडीवर सोपवले गेले. 

एकेका विमानाला अगदी कमी उंचीवरून, पण अतिशय वेगाने, शत्रूच्या धावपट्टीकडे तिरप्या दिशेने उडत जावे लागणार होते. इतर तीन विमानांनी अशाच प्रकारे वेगवेगळ्या दिशांनी उडत येऊन मारा करायचा होता. शत्रूच्या विमानवेधी तोफांना झटपट दिशा बदलून विमानांचा वेध घेता येऊ नये, यासाठी ही रणनीती आवश्यक होती. 

परंतु, या रणनीतीचे काही तोटेदेखील होतेच. हे बॉम्बहल्ले काहीसे अंदाधुंद केले जाणार असल्याने अचूक मारा होण्याची शाश्वती नव्हती. त्यामुळे कदाचित, काही दिवस, किंवा काही आठवडेसुद्धा, सतत व मोठया संख्येने मारा करीत राहण्याची गरज होती. आणि नेमके तेच आपल्याला नको होते. 

दोन वेगवेगळ्या आघाड्यांवर आपले सैन्य शत्रूचा सामना करीत होते. त्यामुळे, पूर्वेकडे मुसंडी मारीत निघालेल्या आपल्या पायदळाला लवकरात लवकर ढाक्यापर्यंत पोहोचता आले असते तरच युद्ध निर्णायकपणे जिंकता येणार होते. हे लक्षात घेऊन, भारतीय वायुसेनेने एक धाडसी निर्णय घेतला.

मिग विमानांनी तेजगांव विमानतळावर केलेला हल्ला 
(ग्रुप कॅप्टन देब गोहाइन यांनी रेखाटलेले कल्पनाचित्र)  

मिग-२१ विमानांनी कमी उंचीवरून, धावपट्टीकडे तिरप्या दिशेने न उडता, खूप उंचावरून अचानक ६० अंशाच्या कोनात खाली सूर मारत यायचे आणि धावपट्टीच्या वरूनच उडत बॉम्ब टाकायचे ठरले. यामुळे आपल्या माऱ्यामध्ये अधिक अचूकता येणार होती, पण आपल्या विमानांना असलेला धोका कैक पटींनी वाढणार होता. 

एकाच दिशेने, एकापाठोपाठ धावपट्टीच्या वरच येत असलेल्या या चारी विमानांचा वेध घेणे शत्रूच्या विमानवेधी तोफांना खूपच सोपे होते.   

आपल्या विमानांना आणि आणि वैमानिकांच्या जीवांना असलेला हा गंभीर धोका पत्करूनही, अशाच प्रकारे हल्ले करायचे ठरले!

चारी मिग-२१ विमानांनी अतिशय विस्मयकारकरीत्या अचूक बॉम्ब टाकून तेजगांवच्या धावपट्टीवर आठ मोठमोठे खड्डे पाडल्याने ती धावपट्टी वापरता येणे अशक्य झाले.

युद्ध संपल्यानंतर, आपल्या मिग वैमानिकांनी केलेली ही कामगिरी जेंव्हा संपूर्ण जगाने  बघितली, तेंव्हा मिग विमाने बनवणाऱ्या रशियन लोकांनीच नव्हे, तर पाकिस्तानचा परममित्र असलेल्या अमेरिकेनेही आश्चर्याने अक्षरशः तोंडात बोटे घातली!

परंतु, युद्धात असे काही घडण्याची शक्यता पाकिस्तान्यांनीही लक्षात घेऊन ठेवली असावी. त्या धावपट्टीवरून सेबर विमानांना जेमतेम उड्डाण करता येईल इतपत दुरुस्ती, पाकिस्तान्यांनी अक्षरशः दिवसरात्र खपत, २४ तासाच्या आत करून टाकली. त्याकाळी रात्रीच्या अंधारात अचूक मारा करता येणे अशक्य होते. पण, पहाटे-पहाटे मिग विमाने हल्ला करण्यासाठी येणार याची त्यांना जवळ-जवळ खात्रीच होती.

परंतु, त्यांच्या ध्यानी-मनी-स्वप्नीही नसलेली कारवाई भारतीय वायुसेनेने केली. 

मिग-२१ विमानांनी पहाटे-पहाटे नव्हे, तर पहाटेपूर्वीच हल्ला केला आणि पाकिस्तान्यांनी दुरुस्त केलेली धावपट्टी बॉम्ब टाकून संपूर्णपणे नादुरुस्त करून टाकली!

आपल्या विमानांनी अचूक बॉम्ब टाकून, तेजगांव धावपट्टीची जी अवस्था केली होती ती पाहिल्यानंतर, पाकिस्तानी हवाईदलाचा एक वरिष्ठ अधिकारी हताशपणे म्हणाला होता, "पूर्वेकडचे पाकिस्तानी हवाईदल संपले असेच म्हणावे लागेल. आता मात्र पूर्व पाकिस्तानची धडगत नाही!"

भारतीय मिग-२१ विमानांनी उध्वस्त केलेली धावपट्टी 

या घटनेनंतर भारतीय वायुसेनेने अगदी दिवसा-ढवळ्यासुद्धा हवाई हल्ले करीत, पूर्व पाकिस्तानातील संपूर्ण हवाई यंत्रणा नष्ट केली आणि सामरिक इतिहासात 'न भूतो,न भविष्यति' अशा एका शौर्यगाथेची नोंद केली. 

भारतीय वायुसेनेने शत्रूवर केवळ 'हवाई वर्चस्व' मिळवले नव्हते, तर पूर्व पाकिस्तानवर आपले 'हवाई साम्राज्य'च स्थापन केले होते!

आता मात्र पूर्व पाकिस्तानचा पाडाव अटळ होता!


मूळ इंग्रजी लेखक: विंग कमांडर अविनाश चिकटे (सेवानिवृत्त) www.avinashchikte.com 
हा लेख खालील लिंकवर प्रकाशित झाला आहे. 

मराठी अनुवाद: कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ९४२२८७०२९४

(लेखातील सर्व छायाचित्रे indiatimes.com च्या सौजन्याने)

Saturday 11 December 2021

१९७१: पूर्व पाकिस्तानला 'किलो फ्लाईट'चा दणका

'किलो फ्लाईट' चे जिगरबाज योद्धे 

याआधीच्या लेखात म्हटल्याप्रमाणे, ३ डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजून चाळीस मिनिटांनी पाकिस्तानने एकाचवेळी सात भारतीय हवाईतळांवर हल्ला चढवला. प्रत्यक्ष युद्धघोषणा करण्यापूर्वीच भारतीय वायुसेनेला गारद करण्याकरिता केलेली ती खेळी होती. 

आश्चर्य म्हणजे भारताच्या पूर्व सीमेवर पाकिस्तानने एकही हल्ला केला नाही. प्रत्यक्ष युद्धामध्ये हवाई हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी आपली संसाधने जपून ठेवण्याचा त्याचा प्रयत्न होता, की 'सेबरचे कर्दनकाळ' ठरलेल्या भारतीय नॅट विमानांनी २२ नोव्हेंबरला जो तडाखा दिला होता त्यामुळे पाक घाबरला असावा, ते निश्चित सांगता येणार नाही. कदाचित तसे  न करण्यामागे युद्धनीतीचा एखादा डावपेचही असू शकेल. 

१९६५ च्या युद्धात पाकिस्तानने भारताविरुद्ध पूर्वेकडची आघाडी उघडलीच नव्हती. "पूर्वेकडच्या सुरक्षेची किल्ली पश्चिम आघाडीवरच सापडेल", हीच पाकिस्तानची त्या काळातली साधी-सोपी युद्धनीती होती. म्हणजेच, भारताची सैन्यदले पश्चिम आघाडीवरच झुंजत ठेवण्यास आपण त्याला भाग पाडले, तर पूर्व पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी भारताकडे सैन्यच उरणार नाही, असा तो विचार होता. १९७१ मध्ये देखील तेच तंत्र वापरण्याचा जनरल याह्याखान यांचा मानस असावा.  

परंतु, भारताची युद्धनीती अर्थातच याच्या संपूर्णपणे विरुद्ध होती. त्यानुसार, पूर्वेकडेच हल्ला करायचे भारताने पक्के ठरवले होते. पण तो हल्ला प्रत्यक्षात भारतीय हवाईदलाने नव्हे तर दुसऱ्याच कोणीतरी केला. 

कोणी आणि का?

'किलो फ्लाईट' चे जिगरबाज योद्धे 

मार्च १९७१ पासून पूर्व पाकिस्तानात सुरु झालेल्या भीषण हत्यासत्र आणि दडपशाहीमुळे, तेथून पळून आलेल्या लाखो शरणार्थींचे लोंढे ईशान्य भारतात येऊ लागले होते. आंतरराष्ट्रीय समुदायाच्या नाराजीला न जुमानता, पाकिस्तानने तेथील नरसंहार सुरूच ठेवला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचा पाकिस्तानला उघड-उघड पाठिंबा असल्याने याह्याखानचा उद्दामपणा वाढतच चालला होता. 

तो नरसंहार थांबवणे भारतासाठीही अत्यंत महत्वाचे होते, कारण त्याशिवाय शरणार्थींचा जनसमुदाय त्यांच्या देशात परतणार नव्हता. कूटनीतिक प्रयत्न अयशस्वी ठरत असल्याने, सैन्यबळ वापरण्याचा मार्गच फक्त उरला होता. म्हणूनच, पूर्व पाकिस्तानला त्याच्या भवितव्यावर सोडून फक्त पश्चिमेकडे लक्ष केंद्रित करण्याचा पर्याय भारताकडे उपलब्धच नव्हता.  

भारतात पळून आलेल्या शरणार्थींनी 'मुक्तीबाहिनी' नावाची एक संघटना उभी केली होती. त्या संघटनेला सर्वतोपरी मदत करण्याचे कार्य भारताने गुप्तपणे हाती घेतलेच होते. मुक्तीबाहिनीमध्ये पाकिस्तानी हवाईदलातून पळून आलेले अनेक बंगाली पायलट व वायुसैनिकही होते. पाकिस्तानी सैन्याला धडा शिकवायला त्यांचे बाहू फुरफुरत होतेच. हवाई युद्धात ते कुशल असल्याने 'किलो फ्लाईट' नावाची एक छोटी हवाई तुकडी त्यांनी उभारली. भारतीय वायुसेनेने त्यांना तीन विमाने भेट दिली. 

मालवाहतूक व दळणवळणासाठी वापरली जाणारी ती तीन विमाने होती - एक 'डाकोटा', एक 'ऑटर', आणि एक 'चेतक' हेलीकॉप्टर. त्यापैकी सगळ्यात मोठे, म्हणजे डाकोटा विमान कलकत्त्यामध्ये अस्थायी रूपात अस्तित्वात आलेल्या 'बांगलादेश सरकार'ने वापरायला सुरुवात केली. 

'चेतक हेलिकॉप्टर'

भारतीय वायुसेनेच्या इंजिनियरांनी 'ऑटर' आणि 'चेतक' हेलीकॉप्टरमध्ये 'जुगाड' करून बंदुका आणि रॉकेट पॉड बसवून दिले. जोरहाट येथील हवाईतळाचे प्रमुख, ग्रुप कॅप्टन चंदन सिंग यांच्या नेतृत्वाखाली भारतीय वायुसेनेच्या  प्रशिक्षकांनी बंगाली पायलट व वायुसैनिकांचे हवाई प्रशिक्षण सुरु केले. 

अतिशय कठोर परिश्रम करून त्या सर्व वायुयोद्ध्यांनी विमाने चालविण्यात आणि अचूक नेमबाजी करण्यात विशेष प्राविण्य मिळवले. रात्रीच्या अंधारात, आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ती विमाने चालवण्याचे आणि त्यामधून शत्रूवर मारा करण्याचे प्रशिक्षण घेऊन 'किलो फ्लाईट' आपल्या कामात तरबेज झाली. 

२८ सप्टेंबर १९७१ रोजी, भारताच्या दिमापूर येथील हवाई तळावर, भारतीय वायुसेनाप्रमुख एयर चीफ मार्शल पी. सी. लाल यांनी औपचारिकपणे 'किलो फ्लाईट' चे उदघाटन केले. 

आजही, दरवर्षी २८ सप्टेंबरला बांगलादेश आपला वायुसेना दिवस साजरा करतो!

वायुसेनाप्रमुख एयर चीफ मार्शल पी. सी. लाल

पाकिस्तानने ३ डिसेंबरच्या सायंकाळी भारताच्या पश्चिम सीमेवरील हवाईतळांवर हल्ला करताच आपण पश्चिम पाकिस्तानवर प्रतिहल्ला चढवला. पूर्व पाकिस्तानवर पहिला हल्ला करण्याचा मान मात्र भारताने 'किलो फ्लाईट'ला दिला!

त्या हल्ल्याबाबत गुप्तता टिकवण्यासाठी, भारताची औपचारिक युद्धघोषणा थोडी उशिरा करावी अशी विनंती, एयर चीफ मार्शल पी. सी. लाल यांनी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधींना केली. श्रीमती गांधींनी त्या विनंतीला मानही दिला! यामागे हेतु असा होता की, पूर्व पाकिस्तानी वायुसेना बेसावध राहावी आणि त्यांच्या विमानांना 'किलो फ्लाईट'च्या छोट्या विमानांवर प्रतिहल्ला करता येऊ नये. 

त्रिपुरामधल्या कैलासशहर विमानतळाच्या ३००० फुटी धावपट्टीवरून 'किलो फ्लाईट'च्या 'ऑटर' विमानाने, आणि जवळच्याच तेलीयामुरा विमानतळावरून 'चेतक' हेलिकॉप्टरने, ३ डिसेंबरच्या संध्याकाळी उड्डाण केले.

दोन्ही विमाने रात्रीच्या अंधारात आणि जवळपासच्या टेकड्यांपासून अतिशय कमी उंचीवरून उडत होती. पाकिस्तानी हवाईदलाला आपला सुगावा लागू नये हाच त्यांचा मुख्य हेतू होता. ती युद्धजन्य परिस्थिती होती म्हणूनच 'किलो फ्लाईट'च्या शूर वैमानिकांनी, कोणत्याही यांत्रिक अथवा मानवी मार्गदर्शनाशिवाय, ते 'आंधळे' उड्डाण करण्याचे धाडस केले. एरवी अशा प्रकारचे उड्डाण करण्याची कल्पनाही कोणी करू शकणार नाही!

तुटपुंज्या शस्त्रास्त्रांसहित, आणि अतिशय कमी वेगाने उडत चाललेल्या त्या विमानांची अवस्था अक्षरशः 'अंधार माझा सोबती' अशीच होती! आपल्या मायभूमीला जुलमी पाकिस्तानी राजवटीतून मुक्त करण्याची विजिगीषा उराशी बाळगलेल्या त्या हवाई योद्ध्यांचे असामान्य साहस हीच काय ती एकमेव जमेची बाजू होती.

'ऑटर' विमान

पाकिस्तानच्या विमानवेधी तोफांचा थोडासा भडिमार त्या दोन्ही विमानांवर झाला, पण  त्यातून ती बचावली. सुदैवाने, पाकिस्तानी विमाने मात्र त्यांच्या मागावर धावली नाहीत. 'ऑटर' विमानाने चितगांव (Chittagong) येथील तेलशुद्धीकरण कारखान्यातल्या तेलसाठ्यांना आग लावली, तर नारायणगंज येथील तेलाच्या टाक्या पेटवून येण्यात 'चेतक' हेलिकॉप्टर यशस्वी ठरले.

दोन्ही विमाने भारतात सुखरूप पोहोचून विमानतळांवर उतरायच्या आतच, पाकिस्तानी तेलसाठ्याची दोन महत्वाची ठिकाणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची सुवार्ता BBC रेडिओने जाहीर केली होती!

नारायणगंजचे तेलसाठे उद्ध्वस्त होताना 
(
ग्रुप कॅप्टन देब गोहाइन यांनी रेखाटलेले कल्पनाचित्र) 

बांगलादेशचा जन्म होण्याआधीच त्यांच्या नवजात हवाईदलाने आपली पहिली कामगिरी अतिशय नेत्रदीपकरीत्या फत्ते केली!

आधीच ठरल्याप्रमाणे, 'किलो फ्लाईट'चा हल्ला यशस्वी झाल्या-झाल्या, म्हणजे ३ डिसेंबरच्या मध्यरात्री, पाकिस्तानविरुद्ध युद्ध पुकारल्याची औपचारिक घोषणा भारताने केली.

४ डिसेंबरच्या पहाटेपासून पूर्वेकडील हवाई हल्ल्याची सर्व सूत्रे भारतीय वायुसेनेने आपल्या हातात घेतली. पुढे काय-काय घडले? 

पुढील लेखात... 


मूळ इंग्रजी लेखक: विंग कमांडर अविनाश चिकटे (सेवानिवृत्त) www.avinashchikte.com 
हा लेख खालील लिंकवर प्रकाशित झाला आहे. 

मराठी अनुवाद: कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ९४२२८७०२९४

(लेखातील सर्व छायाचित्रे indiatimes.com च्या सौजन्याने) 

Monday 6 December 2021

१९७१: अखेर युद्धाला तोंड फुटले...

पाकिस्तानचे लष्करी हुकूमशहा व राष्ट्रपती, जनरल अयूबखान, यांनी एकदा गर्वोक्ती केली होती की, "ज्यांना भाषेचे शस्त्र पुरेसे नसेल, त्यांच्यावर आम्ही शस्त्रांची भाषा वापरू!" 

१९६९ साली जनरल याह्याखान यांनी अयुबखान यांना पदच्युत करून देशाची सूत्रे हाती घेतली. त्यांच्या हुकूमशाहीविरुद्ध पूर्व पाकिस्तानी लोकांनी बंड पुकारताच, याह्याखानांनी सोयिस्करपणे गृहीत धरले की या बंडाच्या मागे भारताचाच हात आहे. त्यांनी अयूबखानांचे ते मग्रूरीचे शब्द स्वतःच्याच, पूर्व पाकिस्तानातील देशवासियांविरुद्ध प्रत्यक्षात आणायला  सुरुवात केली. 

मार्च १९७१ मध्ये, पाकिस्तानी सैन्याने जेंव्हा पूर्व पाकिस्तानात दडपशाही सुरु केली तेंव्हाच भारतीय राज्यकर्त्यांना आणि सैन्यप्रमुखांना हे कळून चुकले होते की पाकिस्तानसोबत आणखी एक युद्ध आता अटळ आहे. पाकिस्तानी सैन्याने जनतेचा विश्वास आणि पाठिंबा संपादन करण्यासाठी, खोटाच प्रचार सुरू केला की पाकिस्तानी सैन्य अजिंक्य आहे. वस्तुस्थिती वेगळीच असली तरी या अपप्रचारामुळे, पाकिस्तानी जनताच नव्हे, तर स्वतः राज्यकर्तेही त्याच भ्रमात बोलू-वागू लागले. 

जसजशी पूर्व पाकिस्तानातील परिस्थिती अधिकाधिक चिघळू लागली, तसे याह्याखान वरचेवर भारताविरुद्ध चिथावणीची भाषा करू लागले. जुलैमध्ये आणि नंतर  सप्टेंबरमध्ये त्यांनी तसे वक्तव्य जाहीरपणेच केले होते.

भारतीय गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार पाकिस्तानने युद्धाची तयारी सुरू केलेली होती. आपल्याच नागरिकांवर आपलेच सैन्य करीत असलेले अत्याचार पाहून वैतागलेले आणि पूर्व पाकिस्तानातच तैनात असलेले कित्येक बंगाली सैनिक पाक सैन्यातून पळून बंगाली मुक्तियोद्धयांना येऊन मिळाले होते. त्यांच्याकडून भारतीय गुप्तचर विभागाला माहितीचा खजिनाच उपलब्ध झाला होता.

पूर्व आणि पश्चिमेकडील भारत-पाक सीमांवर सुरु झालेल्या पाकिस्तानी हवाईदलाच्या वाढत्या हालचाली आपली रडार यंत्रणादेखील टिपत होती. नोव्हेंबर १९७१ पर्यंत पाकिस्तानी हवाईदल खूपच सक्रिय झाले आणि वरचेवर सीमेचे उल्लंघन करू लागले. 

जेंव्हा राजनैतिक स्तरावरच्या सविनय विनंत्यांना पाकिस्तान जुमानत नाही असे लक्षात आले, तेंव्हा मात्र त्यांच्या 'अरे'ला 'कारे' करण्याची मुभा भारतीय सैन्यदलांना दिली गेली.

२२ नोव्हेंबर १९७१ रोजी भारतीय वायुदलाने पाकिस्तानला दिलेले प्रत्त्युत्तर किती चोख होते हे आपण यापूर्वीच्या लेखात वाचलेच आहे. [१९७१ ची पहिली हवाई चकमक]

त्या चकमकीचा परिणाम असा झाला की जनरल याह्याखान यांनी जाहीरच करून टाकले की दहा दिवसांच्या आत पाकिस्तान भारतावर हल्ला करेल. आणि त्यांनी आपले वचन पाळले!

आपली तिन्ही सैन्यदले संपूर्णपणे सज्ज होती. भारतीय वायुसेना तर जणू ३ डिसेंबरच्या संध्याकाळी आपल्या हवाईतळांवर होऊ घातलेल्या पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याची वाटच पाहत होती !

१९६७ साली झालेल्या अरब-इस्रायली युद्धामध्ये, इस्राएलच्या हवाईदलाने अचानक हल्ला करून, इस्राएलला नेस्तनाबूत करण्याच्या तयारीत असलेली जवळ-जवळ सर्वच्यासर्व अरब लढाऊ विमाने उभ्या जागी नष्ट केली होती. त्या युद्धाची खडानखडा माहिती पाकिस्तानी हवाईप्रमुखांकडे होती, कारण आंतरराष्ट्रीय संकेतांना धुडकारून, काही पाकिस्तानी वायुसैनिकांनी अरब देशांतर्फे त्या युद्धात भाग घेतलेला होता! 

अगदी तस्साच धडा भारताला शिकवण्याची स्वप्ने पाकिस्तान पाहत होता!

पण भारतीय वायुदल म्हणजे काही दूधखुळ्यांची फौज नव्हती. अरब-इस्राएल युद्धामधून भारतानेही काही धडे घेतले असू शकतील, ही शक्यता पाकिस्तानने कदाचित विचारातही घेतली नसावी!

आम्ही भारतीय वायुसैनिक नेहमीच असे म्हणतो की, "दुसऱ्यांच्या चुकांमधून जेवढे शिकता येईल तेवढे शिकून घ्या. कारण, स्वतःच्या चुकांमधून शिकून शहाणे होण्याइतके आयुष्य कदाचित तुम्हाला मिळणारच नाही!"

ते जीवनसूत्र भारतीय वायुसेनेने तंतोतंत पाळले होते.

१९६५ च्या युद्धानंतर भारताने सीमावर्ती क्षेत्रात अनेक नवीन हवाईतळ तयार केले होते,  तसेच काही 'Blast Pens' देखील बनवले होते. ब्लास्ट पेन म्हणजे काँक्रीट वापरून बनवलेल्या अतिशय कणखर शेड असतात, ज्यामध्ये विमाने उभी करून त्यांची दुरुस्ती, देखभाल करता येते किंवा त्यामध्ये बॉम्ब लोड करता येतात. अर्थातच, ब्लास्ट पेनमध्ये असलेली विमाने शत्रूच्या बॉम्बवर्षावापासून बऱ्यापैकी सुरक्षित राहू शकतात.

आपल्याला अपेक्षित असलेला पाकिस्तानी हवाई हल्ला ३ डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजून चाळीस मिनिटांनी झाला. प्रत्यक्ष युद्धघोषणा करण्यापूर्वीच भारतीय वायुसेनेला गारद करण्याकरिता केलेली ती खेळी होती. 

केवळ पाच मिनिटांच्या अवधीमध्ये पाकिस्तानने एकाचवेळी सात भारतीय हवाईतळांवर हल्ला चढवला. आग्रा, अंबाला, श्रीनगर, अवंतीपूर, जोधपूर, पठाणकोट, आणि उत्तरलाई या तळांबरोबरच पश्चिम सीमेवरच्या एका विमानवेधी रडार यंत्रणेलादेखील त्यांनी लक्ष्य केले होते.

आश्चर्य म्हणजे पाकिस्तानने भारताच्या पूर्व सीमेवर एकही हल्ला केला नाही. प्रत्यक्ष युद्धामध्ये हवाई हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी आपली संसाधने जपून ठेवण्याचा त्याचा प्रयत्न होता, की 'सेबरचे कर्दनकाळ' ठरलेल्या भारतीय नॅट विमानांनी २२ नोव्हेंबरला जो तडाखा दिला होता त्यामुळे पाक घाबरला असावा, ते निश्चित सांगता येणार नाही.

पाकची खेळी यशस्वी ठरली का? पाहू या...

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका हिंदी सिनेमात दाखवल्याप्रमाणे भारतीय विमाने, पाकिस्तानची आयती शिकार होण्याकरिता, बुजगावण्यांसारखी धावपट्टीवर उभी करून निश्चितच ठेवलेली नव्हती! [वाचा: 'भुज- न भूतो न भविष्यति]

हवाईतळांवर दूर -दूर विखुरलेल्या ब्लास्ट पेन्समध्ये भारतीय लढाऊ विमाने सुखरूप होती. मोठी बॉम्बर विमाने आणि मालवाहू विमाने तर, पाक हवाईदल पोहोचूही शकणार नाही अशा ठिकाणी, म्हणजे सीमेपासून दूरवरच्या तळांवर आधीच हलवलेली होती. 

पाक हवाई हल्ले भारतीय हवाईदलाचे कितीसे नुकसान करू शकले ?

फारसे नाही. कारण, पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांनंतर काही तासांच्या आतच भारतीय हवाईदल पाकला चोख प्रत्त्युत्तर देऊ शकले होते. आपली विमाने त्याच रात्री साडेदहापासून ते मध्यरात्रीपर्यंत पाक हवाईतळांवर मारा करीत होती. 

प्रत्त्युत्तर द्यायला भारताला इतका वेळ का लागला?

आपली बॉम्बर विमाने दूरवरच्या हवाईतळांवर होती. तेथून त्यांना सीमेलगतच्या तळांवर हलवून, त्यात पुन्हा इंधन व दारुगोळा भरल्यानंतरच ती कामगिरीवर जाऊ शकणार होती. शक्तिशाली बॉम्बच्या प्रचंड विस्फोटक क्षमतेमुळे ते बॉम्ब विमानांमध्ये लोड करण्याचे काम मोठेच जिकीरीचे आणि वेळखाऊ असते. शिवाय, युद्धजन्य स्थितीत, सर्वत्र  'ब्लॅकआउट' असल्याने, तंत्रज्ञ व वायुसैनिक ते काम संपूर्ण काळोखामध्ये करीत होते.

४ डिसेंबरच्या पहाटे, ऐन हिवाळ्यातल्या दाट धुक्यामध्येसुद्धा आपल्या सुखॉई, मिग, मारूत, आणि हंटरसारख्या  फायटर विमानांसह कॅनबेरा विमानांनीही पाकिस्तानवर कडवा प्रतिहल्ला चढवला. जमिनीवरून होत असलेल्या शत्रूच्या गोळीबारामुळे आपल्या काही विमानांचे नुकसान झाले, पण तरीही, प्रतिहल्ल्यांची आपली कारवाई चार तारखेच्या दिवसभर सुरूच राहिली. 

ज्या युद्धाच्या धमक्या गेले अनेक महिने जनरल याह्याखान देत होता, ते युद्ध अखेर औपचारिकपणे सुरु झाले.

या युद्धातील लढाया कशाकशा होत गेल्या, हे पुढच्या भागांमध्ये पाहू या...


मूळ इंग्रजी लेखक: विंग कमांडर अविनाश चिकटे (सेवानिवृत्त) www.avinashchikte.com 
हा लेख खालील लिंकवर प्रकाशित झाला आहे. 

मराठी अनुवाद: कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ९४२२८७०२९४

(लेखातील सर्व छायाचित्रे indiatimes.com च्या सौजन्याने)


Sunday 5 December 2021

१९७१ ची पहिली हवाई चकमक

[या चकमकीत सहभागी असलेले (तत्कालीन फ्लाइंग ऑफिसर) विंग कमांडर सुनीत स्वारेस (सेवानिवृत्त) यांनी स्वतः दिलेल्या माहितीवर हा लेख आधारित आहे. (तत्कालीन फ्लाईट लेफ्टनंट) दिवंगत स्क्वाड्रन लीडर एम.ए. गणपती स्वतःच ही गोष्ट सांगत आहेत अशी कल्पना करून हा लेख लिहिलेला आहे.]

डावीकडून: रॉय, बागची, 'सू', 'डॉन' आणि मी (गणपती)

२२ नोव्हेंबर १९७१. कलकत्त्याच्या दमदम विमानतळावर गेल्या काही महिन्यांपासून आमची तुकडी तैनात होती. हवाई हल्ल्यापासून कलकत्ता शहराचा बचाव करण्याची जबाबदारी आमच्यावर सोपवलेली होती आणि ते एक अतिशय उबग आणणारे काम होते. 

मुळात या शहरावर हल्ला करायला कोण आणि कशासाठी आले असते? निरपराध नागरिकांवर हल्ले करून कोणाही शत्रूला, सामरिकदृष्ट्या काय साध्य होणार होते?

आधीच, पूर्व पाकिस्तानच्या नागरिकांवर, म्हणजे स्वतःच्याच देशवासीयांवर, अनन्वित अत्याचार करून, पाकिस्तानच्या लष्करी सत्ताधाऱ्यांनी देशविदेशात आपली भरपूर नाचक्की करून घेतलेली होती. 

पाकिस्तानचा लष्करी हुकूमशहा जनरल याह्याखान हा दारूबाज आणि स्त्रीलंपट मनुष्य होता. पण भारताच्या एका प्रमुख शहरावर हल्ला करून, प्रसारमाध्यमांद्वारे जगभरात स्वतःची आणखी छी:थू करून घेण्याइतकाही तो मूर्ख नव्हता. 

अशा परिस्थितीत आम्ही कलकत्त्यात उगाचच बसून होतो. ज्या युद्धाच्या पोकळ धमक्या गेले अनेक महिने याह्याखान देत होता, ते युद्ध प्रत्यक्षात झाल्याशिवाय मर्दुमकी गाजवायची संधी आम्हाला मिळणार नव्हती. मी युद्धासाठी तन-मनाने सज्ज झालो होतो आणि माझे नॅट विमान घेऊन आकाशात झेपावयाला माझे हात-पाय अक्षरशः शिवशिवत होते. पण सध्या तरी नुसते बसून राहण्याशिवाय नशीबात काही वेगळे दिसत नव्हते. 

१९६५ च्या युद्धातही पूर्वेकडच्या पाक सीमेवर फारसे काहीच घडले नव्हते. आताही तसेच होणार की काय अशी भीती आम्हा सर्वांना वाटत होती. 

त्या दिवशी दुपारी एक वाजता मी ओ.आर.पी. (Operational Readiness Platform) ड्यूटीकरिता विमानतळावर पोहोचलो. माझ्यासोबत फ्लाईट लेफ्टनंट रॉय अँड्रयू मॅसी, फ्लाइंग ऑफिसर डोनाल्ड उर्फ 'डॉन' लाझारस, आणि फ्लाइंग ऑफिसर सुनीत उर्फ 'सू' स्वारेस हे तिघेही होते. 

आजच्या ठरलेल्या व्यूहरचनेप्रमाणे, उड्डाणादरम्यान मी व रॉय आमची दोन विमाने घेऊन सर्वात पुढे म्हणजे 'लीडर' असणार होतो. 'डॉन' आणि 'सू' हे दोघे फ्लाइंग ऑफिसर्स त्यांची विमाने आमच्या दोन्ही बाजूंना ठेवून, म्हणजे आमचे 'विंगमॅन' असणार होते. 

आज सकाळच्या शिफ्टमध्ये आमचे कमांडिंग ऑफिसर आणि इतर तिघा वैमानिकांनी दोन वेळा 'स्क्रॅम्बल' (scramble) ची कारवाई करीत, पाकिस्तानी लढाऊ विमानांचा पाठलाग केला होता. पण पूर्व पाकिस्तानातील बोयरा गावाजवळील सीमेपर्यंत आपली विमाने पोहोचण्यापूर्वीच पाकिस्तानी विमानांनी तिथून पळ काढल्याने 'शिकार' हातातून निसटली होती. 

ड्यूटीवर पोहोचताच आम्ही आपापली विमाने पूर्णतः सज्ज असल्याची खात्री केली, आणीबाणीच्या प्रसंगी विमानातून सुखरूप बाहेर पडण्याकरिता असलेल्या Ejection Seat चे पट्टे तपासले, विमानाच्या तंत्रज्ञांसोबत दोन-चार मिनिटे गप्पा मारल्या आणि ऑफिस व विश्रांतीची जागा असा दुहेरी उपयोग असलेल्या तंबूत येऊन विसावलो.

फ्लाईट लेफ्टनंट के.बी. बागची आमचा फायटर कंट्रोलर होता. आमची दूरसंचार यंत्रणा कार्यरत असल्याची खात्री करून झाल्यावर त्याने आमच्या तंबूमध्ये फोन केला. 

मी फोन उचलत म्हटले, "फ्लाईट लेफ्टनंट गणपती..."

"गुड आफ्टरनून, 'गणा' सर, मी बागची बोलतोय"

"हॅलो केबी, काही गडबड?"

"नाही सर. सकाळी दोन 'स्क्रॅम्बल' झाले. पण आपली विमाने पोहोचेपर्यंत पाकिस्तानी सेबर्स पसार झाली होती."

"वाटल्यास तू आम्हाला स्टॅण्डबाय २  (Standby 2) वर ठेव." मी म्हणालो. 

"ठीक आहे सर. मी योग्य वेळी सांगेन."

सहसा आम्ही स्टॅण्डबाय ५ (Standby 5) वर असायचो. म्हणजेच, फायटर कंट्रोलरकडून इशारा मिळताच आम्ही तडक आमच्या विमानाकडे पळत सुटायचो, आणि इंजिन सुरु करून पाच मिनिटाच्या आत उड्डाण करायचो. 

शत्रूकडून सीमेपार काही संशयास्पद हालचाली होत असल्याची खबर मिळाल्यास फायटर कंट्रोलर आम्हाला अधिक सज्ज स्थितीत, म्हणजे स्टॅण्डबाय २ वर ठेवीत असे. त्या वेळी आम्ही पट्टे बांधून, आमच्या नॅट विमानांच्या सीटवरच बसून राहायचो, ज्यायोगे दोन मिनिटांच्या आत उड्डाण करणे शक्य होई. 

ऐन हिवाळ्यातही कलकत्त्याच्या धावपट्टीवर असलेले उष्ण तापमान आणि अक्षरशः भाजून काढणाऱ्या उन्हात स्टॅण्डबाय २ चा पर्याय निश्चितच सुखावह नव्हता.

तसे पाहता, आज काही पराक्रम गाजवायला मिळायची शक्यता धूसर होती, कारण सकाळीच पाकिस्तानी सेबर्सनी दोन 'स्वीप' केलेले होते. परंतु, काहीतरी घडेल या आशेवर, आम्ही स्टॅण्डबाय २ वर राहून,  स्वतःला उन्हात भाजून घ्यायलाही तयार होतो. 

आम्ही आधी रेडिओवर बातम्या ऐकल्या. मग, थोडा वेळ एकमेकांसोबत गप्पा छाटल्या. त्यानंतर मात्र मी पंख्याच्या झोतात माझ्या कॅम्प कॉटवर पहुडलो आणि घरी पत्र लिहू लागलो. 'डॉन' आणि 'सू' स्क्रॅबल खेळत बसले आणि रॉय वाचनात गढून गेला. 

अचानक सायरन वाजू लागला आणि बागचीचा आवाज लाऊडस्पीकरवर कडाडला, "स्क्रॅम्बल, स्क्रॅम्बल, स्क्रॅम्बल"

लाऊडस्पीकरवर बागची देत असलेल्या सविस्तर सूचना ऐकत-ऐकतच आम्ही आमच्या नॅट विमानांकडे धाव घेतली. 

"कॉकटेल फॉर्मेशन, तीस अंशाच्या दिशेने एक हजार फुटांची उंची त्वरित गाठा, आणि विमानांचा वेग जास्तीत जास्त ठेवा."

नॅट विमानाचे इंजिन अक्षरशः क्षणार्धात सुरू होते. इतके, की आम्ही डोक्यावर हेल्मेट चढवून कॉकपिटचे झाकण बंद करेस्तोवर विमान उड्डाण करायला तयार असते. 

आम्ही रनवेवर पोहोचायच्या आतच डमडम विमानतळाच्या ATC (Air  traffic Control) म्हणजेच हवाई नियंत्रण कक्षातून आम्हाला रेडिओ संदेश मिळाला. "कॉकटेल फॉर्मेशन, क्लियर्ड फॉर टेकऑफ, ऑल फोर एयरक्राफ्ट्स."

सुदैवाने त्या क्षणी कोणतेही प्रवासी विमान उड्डाणाच्या किंवा उतरण्याच्या तयारीत नसल्याने आमच्यासाठी रनवे मोकळा होता. 

रेडिओवर कोणतेही उत्तर देण्याच्या फंदात न पडता, कॉकटेल फॉर्मेशनमधल्या आम्ही चौघांनी उड्डाण करण्यासाठी वेग घेतला.

आमची विमाने हवेवर स्वार होताच आम्ही चाके विमानांच्या पोटात घेतली, आणि ईशान्येकडे निघालो. काही क्षणातच आम्ही एक हजार फुटांची उंची गाठली आणि ५०० नॉट म्हणजेच, ताशी ९०० किलोमीटर वेगाने बोयराच्या दिशेने झेपावलो.

केवळ नकाशा आणि जायरोस्कोपिक होकायंत्रावरच अवलंबून असल्याने, जमिनीवरच्या सर्व खाणाखुणा आम्ही आमच्या मेंदूत अक्षरशः कोरून ठेवल्या होत्या. कारण, अत्यंत वेगवान फायटर विमानाच्या कॉकपिटमध्ये नकाशा पाहत बसण्याची उसंत मिळणे अशक्यच असते. 

शत्रूला आमचा सुगावा लागू न देण्यासाठी त्याच्या रडारच्या कक्षेपेक्षा खालच्या उंचीवर उडत जाणे आमच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे होते. त्याचा एक फायदा असाही होता की त्या उंचीवर धुके असल्याने, आमच्यापेक्षा अधिक उंचीवर असलेल्या शत्रूच्या विमानांना आम्ही पाहू शकलो असतो, पण त्यांना आम्ही दिसणे मात्र अवघड होते. 

काही मिनिटातच आम्ही पूर्व पाकिस्तानातील बोयरा गावाजवळ पोहोचलो. भारत-पाक सीमेवर वाहणाऱ्या नदीच्या तीरावर, घोड्याच्या नालेसारख्या आकाराच्या एका बेचक्यात बोयरा हे गाव वसलेले असल्याने, विमानातूनही ते अगदी सहज ओळखता येत असे.

अचानक आमच्या रेडिओवर बागचीचा आवाज ऐकू आला, "उजवीकडे दोनच्या दिशेला, चार मैलावर घुसखोर विमान... "

घड्याळातील आकड्यांच्या आधारे दिशा दाखवण्याची पद्धत सैन्यदलांमध्ये सर्रास वापरली जाते. नाकासमोर घड्याळातील १२ चा आकडा असल्याची कल्पना केल्यास, आमच्या उजव्या हाताला, २ या आकड्याच्या दिशेला आमच्यापासून चार मैलांवर शत्रूचे घुसखोर विमान असल्याचे रडारवर पाहून, त्याची सूचना बागचीने आम्हाला रेडिओवर दिली होती. 

'डॉन' आणि मी, आमच्या चार विमानांच्या फॉर्मेशनमध्ये सर्वात उजवीकडे उडत असल्याने आम्ही शत्रूच्या अधिक जवळ होतो. 'सू' जरी डाव्या बाजूने उडत असला तरी अचूक 'स्पॉटिंग' करण्यात त्याचा हातखंडा होता. फॉर्मेशनमध्ये आपल्या 'लीडर'च्या विमानासोबत स्वतःचे विमान उडवत असताना, एकीकडे संपूर्ण आकाशावर नजर ठेवत शत्रूचे विमान शोधण्याच्या कौशल्याला 'स्पॉटिंग' असे म्हणतात. 

आमच्या अपेक्षेप्रमाणेच 'सू'चा आवाज रेडिओवर खणाणला, "कॉन्टॅक्ट." 

म्हणजेच शत्रूचे विमान त्याला दिसले होते. आम्हा सर्वानाही ते दिसावे म्हणून, ते विमान कोणत्या दिशेने व कसे उडत आहे याचे धावते वर्णन 'सू' करू लागला.

"कोणते विमान आहे?" फ्लाईट लेफ्टनंट बागचीने विचारले. 

त्या विमानाच्या दिशेने आपले विमान वळवीतच रॉयने उत्तर दिले, "सेबर."

रॉयचे विमान आपल्या दिशेने वळल्याचे दिसताच, स्वतःचा बचाव करण्यासाठी शत्रूच्या पायलटने त्याचे विमान अतिशय वेगाने वळवले. 

त्या विमानाला आपल्या टप्प्यात ठेवत, रॉय आणि 'सू' या दोघांनीही आपापली विमाने त्याच्या दिशेने वळवली आणि त्याचा पाठलाग सुरु केला. 

आपले विमान रॉयच्या विमानाच्या जोडीने उडवत असतानाच, आकाशावर नजर ठेवण्याचे आणि काही दिसल्यास त्वरित त्याची खबर देण्याचे काम 'सू' चोख बजावत होता. तो रेडिओवर ओरडला, "आणखी एक सेबर, ७ च्या दिशेला..."

हे ऐकताच मी व 'डॉन'ने आपापली विमाने त्यांच्या दिशेने वळवली. मी वाचलेल्या काही इंटेलिजन्स रिपोर्टमधली माहिती मला आठवली. काही सेबर विमानामध्ये अमेरिकेची 'साईडवाईन्डर' मिसाईल बसवलेली होती, जी आमच्या विमानातील बंदुकांपेक्षा दूरपर्यंत सहजपणे मारा करू शकत होती.

रॉय आणि 'सू' ज्या विमानाचा पाठलाग करीत होते ते सेबर तर मला दिसलेच पण त्यांच्या पिछाडीवर अचानक आलेले, आणि त्यांच्यावर क्षेपणास्त्राचा मारा करण्यासाठी सज्ज होत असलेले ते दुसरे पाकिस्तानी सेबर विमानही मी पाहिले. 

रेडिओवर "कॉन्टॅक्ट" असे ओरडतच मी त्या दुसऱ्या सेबरवर नेम धरला. मी मारलेल्या गोळ्या त्या सेबरला लागून त्याच्या पंखातून धूर येऊ लागल्याचे दिसताच मी आमचा ठरलेला कोडवर्ड रेडिओवर जाहीर केला, "मर्डर, मर्डर!"

आमच्या विमानांखाली असलेल्या धुक्यातून तिसरे एक सेबर विमान अनपेक्षितपणे वर आले. 'डॉन'च्या विमानापासून ते फक्त १५ मीटरवर होते. पण, त्या धक्क्यातून 'डॉन' निमिषार्धात सावरला आणि त्याने त्या सेबरवर आपल्या विमानाच्या बंदुकीचा मारा केला. 

दरम्यान, रॉय ज्या सेबरचा पाठलाग करीत होता ते वेगाने खाली सूर मारीत ढाक्याच्या दिशेने निघाले होते. पण, रॉयने आपल्या विमानाच्या बंदुकीने त्याचाही वेध घेतला. 

या सर्व घडामोडी केवळ तीन मिनिटात घडल्या होत्या!

मी व 'डॉन'ने टिपलेली दोन्ही सेबर विमाने तिथल्यातिथे कोसळली. त्यांच्या वैमानिकांनी ऐनवेळी पॅराशूटच्या सहाय्याने उड्या मारल्या, पण जमिनीवर पोहोचताच त्यांना युद्धकैदी म्हणून ताब्यात घेतले गेल्याचे आम्हाला नंतर समजले. रॉयने ज्या विमानाचा वेध घेतला होता त्याचे नुकसान झाले होते, पण ते मात्र ढाक्यापर्यंत परत पोहोचण्यात यशस्वी झाले असे नंतर कळाले.

अशा प्रकारे, पाकिस्तानची तिन्ही सेबर विमाने निकामी करण्यात आम्ही यशस्वी ठरलो होतो, आमच्या विमानांची काहीही हानी होऊ न देता!

प्रत्यक्ष युद्धाची घोषणादेखील होण्याआधीच, ही पहिली हवाई चकमक भारताने जिंकली होती!

डमडम विमानतळावर उतरण्याआधी माझे विमान स्वतःभोवतीच गोलगोल फिरवीत 'Victory Roll' करण्याचा मोह मला अजिबात आवरता आला नाही. 

माझी ती हवाई कसरत बघून विस्मयचकित झालेला ATC कंट्रोलर रेडिओवर कसेबसे इतकेच म्हणू शकला, "Maintain  discipline!"  

मोठ्याने हसत-हसतच मी माझे विमान उतरवले. पाठोपाठ रॉय, 'डॉन' आणि 'सू' देखील येऊन पोहोचले. 

आमच्या पराक्रमाची खबर आमच्या तंत्रज्ञांना आणि स्क्वाड्रनमधील सर्वांनाच समजली होती. रँक किंवा सिनियॉरिटी, या कशाचीच तमा न बाळगता, त्यांनी आम्हाला अक्षरशः आपल्या खांद्यांवर उचलूनच कॉकपिटमधून बाहेर काढले!

आपण एखाद्या कामासाठी सदैव सज्ज राहतो, विजयासाठी मनोमन प्रार्थनाही करीत असतो. पण संधी कधीतरी अचानकच दरवाजा ठोठावते. काही क्षणांसाठीच जेंव्हा ती येते, तेंव्हा तिला फक्त दोन्ही हातांनी कवटाळायचे असते, आणि विजयाची नशा अनुभवायची असते, बस्स !

या संपूर्ण कामगिरीबद्दल आमच्यावर पदकांचा वर्षाव झाला. आमचा फायटर कंट्रोलर, फ्लाइंग ऑफिसर बागचीला वायुसेना पदक मिळाले. रॉय, 'डॉन', आणि मी, आम्ही तिघेही वीरचक्राचे मानकरी ठरलो. आमच्या कमांडिंग ऑफिसरना विशिष्ट सेवा पदक देण्यात आले. 

फ्लाइंग ऑफिसर सुनीत उर्फ 'सू' स्वारेस, ज्याच्या तीक्ष्ण नजरेने शत्रूची विमाने सर्वप्रथम पाहिली होती, आणि ज्याने आम्हाला सुखरूपपणे त्या तिन्ही विमानांचा वेध घेण्यासाठी दिशा दाखवली होती, त्याला स्वतःला मात्र शिकार करण्यासाठी शत्रूचे कोणतेच सावज उरले नव्हते! केवळ त्यामुळेच त्या तरुण आणि शूर फ्लाइंग ऑफिसरला कोणतेही पदक मिळाले नाही. पण आमच्यासाठी मात्र तो सदैव हिरोच राहिला. 

आम्हाला नंतर समजले की, त्या दिवशी ढाका विमानतळाहून एकूण चार सेबर विमाने निघाली होती. पण एका विमानाचा रेडिओ निकामी झाल्यामुळे ते परत फिरले होते. 

ते विमान जर आले असते तर कदाचित ते 'सू'च्या बंदुकीचा बळी झाले असते!

किंवा कोण जाणे, कदाचित त्या चौथ्या सेबरने माझाच वेध घेतला असता!

म्हणतात ना, जीवन आणि मृत्यूच्या दरम्यान नेहमीच दैव नावाची एक अदृश्य, अमूर्त शक्ती कार्यरत असते!


मूळ इंग्रजी लेखक: विंग कमांडर अविनाश चिकटे (सेवानिवृत्त) www.avinashchikte.com 
हा लेख खालील लिंकवर प्रकाशित झाला आहे. 

मराठी अनुवाद: कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ९४२२८७०२९४

(लेखातील सर्व छायाचित्रे indiatimes.com च्या सौजन्याने)

Friday 3 December 2021

एअर पॉवर म्हणजे नक्की काय?

१७ डिसेंबर १९०३ रोजी, राईट बंधूंनी गुरुत्वाकर्षणाचे नियम अक्षरशः धाब्यावर बसवले आणि गगनाला गवसणी घातली. संपूर्णतः मानवी नियंत्रणाखाली केलेले इतिहासातले ते पहिले-वहिले उड्डाण होते. 

केवळ १२ सेकंदाच्या त्या उड्डाणामध्ये, जमिनीपासून फक्त दहा फूट उंचीवरून उडत, ते विमान जेमतेम एकशेवीस फूट अंतर जाऊ शकले. परंतु भविष्यामध्ये, राने-वने, दऱ्या-डोंगरच नव्हे तर अथांग समुद्रांवरूनही झेप घेऊन पृथ्वीला संकुचित करण्याची क्षमता त्या विमानाने जगाला दिली. 

त्या दिवशी वाऱ्याच्या एका झोताने त्या विमानाला भिरकावून त्याचे तुकडे-तुकडे केले खरे, पण उड्डाणाचे स्वप्न मात्र अभंग राहिले. त्यानंतर काही दशकातच मानवाने आकाश जिंकून अवकाशात झेप घेतली. 

राईट बंधूंच्या त्या पहिल्या उड्डाणाची आठवण म्हणून, त्याच विमानाच्या तुटक्या पंखाचा एक कापडी तुकडा खिशात घेऊन, १९६९ मध्ये नील आर्मस्ट्राँग चंद्रावर उतरला होता!

१९६२ साली विमानातून पृथ्वीप्रदक्षिणा करणारा पहिला अमेरिकन वैमानिक जॉन ग्लेन याने वयाच्या ७७व्या वर्षी, १९९८ मध्ये पुन्हा तोच पराक्रम केला. त्याच्याही खिशात राईट बंधूंच्या विमानाचा एक तुकडा होता!

एप्रिल २०२१ मध्ये नासाने आपले 'इंजेन्युइटी' नावाचे यान मंगळावर उतरवले. राईट बंधूंच्या विमानाचा एक तुकडा त्या अवकाशयांनामध्येही होताच !    

१९०३ सालच्या त्या ऐतिहासिक उड्डाणाचे महत्व सैन्यदलांना समजायला अजिबात वेळ लागला नाही. तोपावेतो फक्त जमीन आणि समुद्रापर्यंत सीमित असलेले युद्धक्षेत्र आता आसमंतापर्यंत विस्तारणार होते. उंची, वेग आणि पल्ला, या तिन्ही बाबतीत सरस असलेले हे 'हवाई खेळणे' एक अत्यंत प्रभावी हत्यार ठरू शकणार होते! 

शत्रुचे सैन्य किती आहे आणि ते कसे तैनात केलेले आहे ही माहिती अत्यंत महत्वाची असते. म्हणूनच, हवाई टेहळणीसाठी विमानांचा वापर सर्वप्रथम सुरु झाला. अर्थातच, त्या टेहळणी विमानांवर शत्रुसैन्य गोळ्या झाडत असे, पण ते व्यर्थच होते. कारण, वेगवान विमानांना टिपणे सोपे निश्चितच नसते. 

त्या काळच्या, लाकूड आणि कापड वापरून बनवलेल्या नाजूक विमानांतून फक्त छोटे बॉम्ब टाकणे शक्य असल्याने शत्रूचे फारसे नुकसान होत नसे. पण मोठा आवाज करीत विमाने अचानक येत आणि काही कळायच्या आत थोडाफार अग्निवर्षाव करून निघूनही जात. शत्रूच्या मुलखात दूरपर्यंत पोहोचण्याची क्षमता असल्याने, शत्रुसैन्याचे मनोबल खच्ची करण्याचे आणि तेथील जनतेच्या छातीत धडकी भरवण्याचे काम विमाने चोख बजावत असत. 

लवकरच, दोन्ही बाजूंच्या विमानांचे आपसातले हवाई युद्धही सुरु झाले. कारण, सैन्यदलांच्या हे लक्षात आले की 'हवाईक्षमता ज्याची खरी, तोच पृथ्वीवर राज्य करी'!

दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या फौजांनी पश्चिमी युरोप अक्षरशः विजेच्या वेगाने पादाक्रांत करत इंग्लंडची खाडी गाठली होती. पण त्यापुढचे २१ मैल समुद्रमार्गे पार करून इंग्लंडवर हल्ला करण्यासाठी जर्मनीच्या 'लुफ्टवाफ्फ' या हवाईदलाला इंग्लंडच्या 'रॉयल एअर फोर्स' (RAF) ला नमवून 'हवाई वर्चस्व' (Air Superiority) मिळवणे भाग होते, जे त्यांना शेवटपर्यंत जमले नाही. तसे झाले असते तर मात्र दुसऱ्या महायुद्धाचा आणि संपूर्ण जगाचा इतिहास काही वेगळाच झाला असता!

RAF च्या वैमानिकांचे तोंडभरून कौतुक करताना इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान विन्स्टन चर्चिल म्हणाले होते, "मूठभर लोकांनी, इतक्या मोठ्या जनसमुदायावर एवढे प्रचंड उपकार आजपर्यंत कधीही केले नसतील!" 

हवाईदल म्हणजे जणू पायदळाच्या तोफखान्याचेच एक शेपूट असल्याचा गैरसमज पूर्वी लोकांच्या मनात होता. काही प्रमाणात तो गैरसमज आजही प्रचलित आहे. प्रत्यक्षात मात्र, हवाईदलाच्या कार्याची आणि एकंदर क्षमतेची व्याप्ती खूप मोठी आहे. 

दुसऱ्या महायुद्धात सागरी चकमकींमध्ये हवाईदलांनीही भाग घेऊन मोठीच कामगिरी बजावली. केवळ सागरी सामर्थ्याच्या बळावर आपापल्या देशांचे साम्राज्य जगभर पसरवणाऱ्या युद्धनौका, विमानातून अचूक टाकलेल्या बॉम्बमुळे सागराच्या उदरात गडप होऊ लागल्या! 

युद्धसामग्री तयार करणाऱ्या जर्मन कारखान्यांना वीज पुरवणारी मोठमोठी धरणे RAF च्या वैमानिकांनी उद्ध्वस्त केल्यामुळे दुसऱ्या महायुद्धात जर्मन युद्धक्षमतेचे कंबरडे मोडले होते!

जपानच्या भूमीवर अमेरिकन सैनिकाचे पाऊल पडायच्याही आधी अमेरिकेने विमानातून दोन अणुबॉम्ब टाकून जपानला शरणागती पत्करायला भाग पाडले होते. 

असंख्य सामरिक बलस्थाने असूनही हवाईदलाच्या खऱ्याखुऱ्या क्षमतेबाबत जनमानसामध्ये संदिग्धताच दिसते. विन्स्टन चर्चिल स्वतःच म्हणाले होते, "हवाईदलाच्या युद्धक्षमतेचा नेमका अंदाज बांधणे खूपच कठीण आहे." 

अलीकडेच आणखी कुणीतरी असेही म्हणून ठेवले आहे, "हवाईदलाची युद्धक्षमता म्हणजे, नवीन पिढीच्या प्रणयाराधनेसारखीच आहे... "  

कुणी काहीही म्हणो, पण हवाई ताकद ही एखाद्याला अतिशय गर्भगळित करणारी किंवा अतिशय उल्हसित करणारीही असू शकते. अर्थातच, विमानातून सोडले गेलेले क्षेपणास्त्र तुमच्या दिशेने येत आहे की तुमच्यापासून दूर जाणाऱ्या त्या अस्त्राचे अग्निपुच्छ तुम्ही पाहत आहात, यावर ते अवलंबून असेल! 

१९७१ च्या भारत-पाक युद्धात, पूर्व पाकिस्तानवरील संपूर्ण आकाशावर भारतीय वायुसेनेने वर्चस्व मिळवलेले होते. म्हणूनच भारतीय नौदल आणि पायदळाला चहूबाजूंनी ढाक्यापर्यंत मुसंडी मारता आली. केवळ चौदा दिवसात भारताने पाकिस्तानला सपशेल पराभूत केले, ९०००० पाकिस्तानी युद्धकैदी ताब्यात घेतले आणि बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळवून दिले ते याचमुळे!

भारतीय वायुदलाच्या विजयगाथेची एक लेखमाला आपल्यापुढे सादर होत आहे, त्या मालेतले हे पहिले पुष्प ! 


मूळ इंग्रजी लेखक: विंग कमांडर अविनाश चिकटे (सेवानिवृत्त) www.avinashchikte.com 
'How India Used Air Power In Bangladesh Liberation War In 1971'
हा लेख खालील लिंकवर प्रकाशित झाला आहे. 

मराठी अनुवाद: कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ९४२२८७०२९४

(लेखातील सर्व छायाचित्रे indiatimes.com च्या सौजन्याने)


Tuesday 31 August 2021

एक अविस्मरणीय 'फौजी' गोकुळाष्टमी !

काल अचानकच मला १९९०च्या दशकातील एका गोकुळाष्टमीची आठवण झाली. आमची गोरखा बटालियन त्या काळी हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथील लष्करी छावणीमध्ये तैनात होती.

गोरखा सैनिकाला प्रेमाने 'कांछा' (मुलगा) असे म्हटले जाते. हे सैनिक मनाने अतिशय निर्मळ, आणि देवभक्त असतात. त्यांच्या भाबड्या बाह्य रूपामुळे, ते किंचित मंदबुद्धी असावेत असा अनेकांचा गैरसमज होतो, परंतु, तसे अजिबात नाही. गोरखा सैनिक अतिशय कडवे लढवय्ये, आणि कमालीचे आज्ञाधारक म्हणून जगप्रसिद्ध आहेत. 

आमच्या बटालियनमध्ये सर्वच धार्मिक सण अतिशय उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरे होत असत. सर्व धर्मांचे शिक्षण घेऊन सैन्यदलात भरती झालेले, व 'पंडितजी', 'मौलवी', 'ग्रंथी' किंवा 'पाद्री' अशा नावाने ओळखले जाणारे जवान प्रत्येक युनिटमध्ये असतात. त्या काळी आमच्या बटालियनचे 'पंडितजी' रक्ताच्या कर्करोगाने आजारी होते. अर्थातच, पारंपरिक गोकुळाष्टमीचे आयोजन करण्यासाठी त्या वर्षी पंडितजी असणार नव्हते. 

सैन्यदलाचे कोणतेच काम कुणा एकावाचून कधीच अडत नाही. अर्थातच गोकुळाष्टमीची 'मंदिर परेड' देखील पंडितजीविनाच पार पाडणे क्रमप्राप्त होते. (मंदिरातील कोणत्याही उत्सव किंवा एकत्रित धार्मिक कार्यक्रमांना बोली भाषेत 'मंदिर परेड' असेच म्हटले जाते!) त्यामुळे, एक 'कामचलाऊ पंडितजी' निवडण्याची जबाबदारी कमांडिंग ऑफिसरसाहेबांनी माझ्यावर सोपवली. पूजापाठ आणि मंत्रोच्चारणाचे जुजबी ज्ञान असलेला एखादा सैनिक त्या कामासाठी पुरेसा होता. 

आमच्या बटालियनमध्ये जरा चौकशी केल्यावर मला एक एक छेत्री (ब्राह्मण) नेपाळी मुलगा सापडला. थोडेफार संस्कृत श्लोक, आणि पूजा-अर्चा यांची जाण असलेला व बऱ्यापैकी धार्मिक वृत्तीचा असा तो जवान, दिसायला अगदीच पोरगेला होता. मी त्याची चौकशी करायला सुरुवात केली. जेमतेम १-२ वर्षे लष्करी सेवा केलेला तो मुलगा थोडा घाबरला. पण, जी जबाबदारी सोपवण्याकरिता मी त्याची चौकशी करीत होतो ते समजताच, त्याने खास 'कांछा स्टाईल' ने मला उत्तर दिले "हुंछा शाब"! 

त्याउप्पर त्या कांछाने मला सांगितले की स्वतःच्या घरी आणि आमच्या युनिटच्या मंदिरात विविध पूजा-अर्चा होताना त्याने अनेक वेळा पाहिल्या होत्या आणि तो ही गोकुळाष्टमीची पूजा सुरळीत पार पाडू शकेल. तो नेमके कोणकोणते विधी, आणि कसेकसे करणार याविषयी आणखी चार प्रश्न विचारून मी खात्री करून घेतली आणि निश्चिन्त झालो. शंख वाजवणे, भगवान श्रीकृष्णाच्या पाळण्याची दोरी हळूहळू खाली सोडणे, जन्मोत्सवानंतर प्रसाद वितरण करणे, अशी व यासारखी इतरही कामे करण्यासाठी, मी आणखी दोन जवान त्याच्यासोबत नेमले. 

गोकुळाष्टमीच्या रात्री, सर्व अधिकारी, जवान आणि त्यांचे परिवार मंदिरात एकत्र जमले. कमांडिंग ऑफिसरही पोहोचले. सुमारे साडेअकरा वाजल्यापासून, अत्यंत जोशात आणि भक्तिभावाने आमचे 'कामचलाऊ पंडितजी' संस्कृत मंत्रोच्चार करू लागले. अधून-मधून भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील कथाही त्याने सांगितल्यावर, मी सुखावलो. मी केलेली निवड अजिबात चुकली नसल्याचे मला जाणवले. सर्वजण तल्लीन होऊन कथा ऐकत होते व भजने म्हणण्यात सहभागी होत होते. 

पण, कृष्णजन्माची घटिका जसजशी जवळ येऊ लागली तसे मला जाणवले की आमचा 'कामचलाऊ पंडितजी' काहीसा अस्वस्थ होता. जणू तो त्याच्या दोन साथीदारांना गुपचूप काहीतरी सांगण्याचा किंवा विचारण्याचा प्रयत्न करीत होता.

बरोबर अकरा वाजून एकोणसाठ मिनिटे होताच तो उठून उभा राहिला. रेशमी कुडता, आणि सोनेरी काठाचे धोतर, अशा वेषातच, पाय आपटून त्याने कडक 'सावधान पोझिशन' घेतली. ताडताड पावले टाकीत त्याने कमांडिंग ऑफिसरसाहेबांच्या दिशेने कूच केले. मला अनपेक्षित असलेल्या त्याच्या या हालचाली पाहून मी पूर्णपणे बावचळून गेलो होतो. 

त्या कांछाने कमांडिंग ऑफिसरसाहेबांना कडक सलाम ठोकला, आणि एखाद्या ड्रिल परेडमध्ये शोभेल असा आवाज लावत तो ओरडला, "श्रीमान, श्रीकृष्ण भगवान को जन्म करने की अनुमती चाहता हूँ!"

त्या भाबड्या आणि पोरसवद्या कांछाची चूक म्हणावी, तर ती चूकही नव्हती. युनिटमध्ये होणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात कमांडिंग ऑफिसरसाहेबांची परवानगी घेतल्यानंतरच केली जाते, हे त्याने अनेकदा पाहिले असणार. ऐन कृष्णजन्माचा सोहळा होण्यापूर्वी अशी परवानगी घेणे आवश्यक आहे की नाही याच संभ्रमात पाच मिनिटे काढल्यानंतर ऐनवेळी, 'It is better to err on the safer side' असा विचार त्याने केला असणार! 

परंतु, काहीही पूर्वकल्पना नसताना अचानक घडलेल्या या घटनेमुळे माझ्या तोंडाचा भलामोठा 'आ' वासलेला होता. सगळीकडे अक्षरशः नीरव शांतता पसरली होती. युनिटमधील सर्वच अधिकारी आळीपाळीने माझ्याकडे आणि कमांडिंग ऑफिसरसाहेबांकडे पाहू लागले होते. जवान तर अगदीच घाबरून गेलेले होते. "आता पुढे काय होणार?" हाच प्रश्न सर्वांच्या चेहऱ्यावर होता. 

झालेली गडबड आमच्या कमांडिंग ऑफिसरसाहेबांनी एका निमिषार्धात जाणली. त्यांनी शांतपणे एक नजर सर्वत्र फिरवली आणि त्या कांछाकडे पाहत अत्यंत धीरगंभीर स्वरात ते म्हणाले, "पंडितजी, भगवान श्रीकृष्ण जी को पैदा करें" 

त्या क्षणी, भगवान श्रीकृष्णाचा पाळणा खाली सोडला गेला आणि ढोलक-झान्जाच्या नादात, सर्वांनी एकमुखाने जयजयकार सुरु केला. अर्थात, त्याआधी संपूर्ण मंदिर परेडने सुटकेचा नि:श्वास सोडला असणार यात शंका नाही. 

नेहमीच असे म्हटले जाते की, "सैन्यात प्रत्येक कामासाठी एक ठराविक पद्धत, किंवा 'ड्रिल' असते". 

त्याचा प्रत्यय आम्हा सर्वांना त्या दिवशी आला. त्या अपरिपक्व आणि अननुभवी कांछाने, नेमून दिली गेलेली ठराविक पद्धत मंदिरातदेखील अवलंबली, आणि प्रत्यक्ष भगवंताच्या जन्मासाठी कमांडिंग ऑफिसरसाहेबांची अनुमती मागितली.

एखाद्याने ती चूक हसण्यावारी तरी नेली असती किंवा त्या सैनिकाला जागच्याजागी धारेवरच धरले असते. 

परंतु, असेही म्हटले जाते की, "सैन्यदल कोणताही प्रसंग सूज्ञपणे आणि खंबीरपणे हाताळते."  

आमच्या कमांडिंग ऑफिसरसाहेबांनी ती परिस्थिती अतिशय धीरोदात्तपणे निभावून नेली आणि त्या सोहळ्याचे पावित्र्य अबाधित ठेवले. नेतृत्त्वकौशल्य या विषयात, आम्हा सर्वांसाठीच तो एक मोलाचा धडा होता. 

युद्ध असो किंवा मंदिरांतील धार्मिक सोहळा असो, आपल्या बटालियनचे नेतृत्व करणाऱ्या कमांडिंग ऑफिसरची भूमिका अतिशय महत्वाची आणि निर्णायक ठरते  हेच खरे! 

जय हिंद!

_________________________________________________________________________________

मूळ इंग्रजीअनुभव लेखक: ब्रिगेडियर सतीश घाटपांडे (सेवानिवृत्त)

मराठी भावानुवाद:  कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) 

९४२२८७०२९४