Saturday 11 December 2021

१९७१: पूर्व पाकिस्तानला 'किलो फ्लाईट'चा दणका

'किलो फ्लाईट' चे जिगरबाज योद्धे 

याआधीच्या लेखात म्हटल्याप्रमाणे, ३ डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजून चाळीस मिनिटांनी पाकिस्तानने एकाचवेळी सात भारतीय हवाईतळांवर हल्ला चढवला. प्रत्यक्ष युद्धघोषणा करण्यापूर्वीच भारतीय वायुसेनेला गारद करण्याकरिता केलेली ती खेळी होती. 

आश्चर्य म्हणजे भारताच्या पूर्व सीमेवर पाकिस्तानने एकही हल्ला केला नाही. प्रत्यक्ष युद्धामध्ये हवाई हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी आपली संसाधने जपून ठेवण्याचा त्याचा प्रयत्न होता, की 'सेबरचे कर्दनकाळ' ठरलेल्या भारतीय नॅट विमानांनी २२ नोव्हेंबरला जो तडाखा दिला होता त्यामुळे पाक घाबरला असावा, ते निश्चित सांगता येणार नाही. कदाचित तसे  न करण्यामागे युद्धनीतीचा एखादा डावपेचही असू शकेल. 

१९६५ च्या युद्धात पाकिस्तानने भारताविरुद्ध पूर्वेकडची आघाडी उघडलीच नव्हती. "पूर्वेकडच्या सुरक्षेची किल्ली पश्चिम आघाडीवरच सापडेल", हीच पाकिस्तानची त्या काळातली साधी-सोपी युद्धनीती होती. म्हणजेच, भारताची सैन्यदले पश्चिम आघाडीवरच झुंजत ठेवण्यास आपण त्याला भाग पाडले, तर पूर्व पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी भारताकडे सैन्यच उरणार नाही, असा तो विचार होता. १९७१ मध्ये देखील तेच तंत्र वापरण्याचा जनरल याह्याखान यांचा मानस असावा.  

परंतु, भारताची युद्धनीती अर्थातच याच्या संपूर्णपणे विरुद्ध होती. त्यानुसार, पूर्वेकडेच हल्ला करायचे भारताने पक्के ठरवले होते. पण तो हल्ला प्रत्यक्षात भारतीय हवाईदलाने नव्हे तर दुसऱ्याच कोणीतरी केला. 

कोणी आणि का?

'किलो फ्लाईट' चे जिगरबाज योद्धे 

मार्च १९७१ पासून पूर्व पाकिस्तानात सुरु झालेल्या भीषण हत्यासत्र आणि दडपशाहीमुळे, तेथून पळून आलेल्या लाखो शरणार्थींचे लोंढे ईशान्य भारतात येऊ लागले होते. आंतरराष्ट्रीय समुदायाच्या नाराजीला न जुमानता, पाकिस्तानने तेथील नरसंहार सुरूच ठेवला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचा पाकिस्तानला उघड-उघड पाठिंबा असल्याने याह्याखानचा उद्दामपणा वाढतच चालला होता. 

तो नरसंहार थांबवणे भारतासाठीही अत्यंत महत्वाचे होते, कारण त्याशिवाय शरणार्थींचा जनसमुदाय त्यांच्या देशात परतणार नव्हता. कूटनीतिक प्रयत्न अयशस्वी ठरत असल्याने, सैन्यबळ वापरण्याचा मार्गच फक्त उरला होता. म्हणूनच, पूर्व पाकिस्तानला त्याच्या भवितव्यावर सोडून फक्त पश्चिमेकडे लक्ष केंद्रित करण्याचा पर्याय भारताकडे उपलब्धच नव्हता.  

भारतात पळून आलेल्या शरणार्थींनी 'मुक्तीबाहिनी' नावाची एक संघटना उभी केली होती. त्या संघटनेला सर्वतोपरी मदत करण्याचे कार्य भारताने गुप्तपणे हाती घेतलेच होते. मुक्तीबाहिनीमध्ये पाकिस्तानी हवाईदलातून पळून आलेले अनेक बंगाली पायलट व वायुसैनिकही होते. पाकिस्तानी सैन्याला धडा शिकवायला त्यांचे बाहू फुरफुरत होतेच. हवाई युद्धात ते कुशल असल्याने 'किलो फ्लाईट' नावाची एक छोटी हवाई तुकडी त्यांनी उभारली. भारतीय वायुसेनेने त्यांना तीन विमाने भेट दिली. 

मालवाहतूक व दळणवळणासाठी वापरली जाणारी ती तीन विमाने होती - एक 'डाकोटा', एक 'ऑटर', आणि एक 'चेतक' हेलीकॉप्टर. त्यापैकी सगळ्यात मोठे, म्हणजे डाकोटा विमान कलकत्त्यामध्ये अस्थायी रूपात अस्तित्वात आलेल्या 'बांगलादेश सरकार'ने वापरायला सुरुवात केली. 

'चेतक हेलिकॉप्टर'

भारतीय वायुसेनेच्या इंजिनियरांनी 'ऑटर' आणि 'चेतक' हेलीकॉप्टरमध्ये 'जुगाड' करून बंदुका आणि रॉकेट पॉड बसवून दिले. जोरहाट येथील हवाईतळाचे प्रमुख, ग्रुप कॅप्टन चंदन सिंग यांच्या नेतृत्वाखाली भारतीय वायुसेनेच्या  प्रशिक्षकांनी बंगाली पायलट व वायुसैनिकांचे हवाई प्रशिक्षण सुरु केले. 

अतिशय कठोर परिश्रम करून त्या सर्व वायुयोद्ध्यांनी विमाने चालविण्यात आणि अचूक नेमबाजी करण्यात विशेष प्राविण्य मिळवले. रात्रीच्या अंधारात, आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ती विमाने चालवण्याचे आणि त्यामधून शत्रूवर मारा करण्याचे प्रशिक्षण घेऊन 'किलो फ्लाईट' आपल्या कामात तरबेज झाली. 

२८ सप्टेंबर १९७१ रोजी, भारताच्या दिमापूर येथील हवाई तळावर, भारतीय वायुसेनाप्रमुख एयर चीफ मार्शल पी. सी. लाल यांनी औपचारिकपणे 'किलो फ्लाईट' चे उदघाटन केले. 

आजही, दरवर्षी २८ सप्टेंबरला बांगलादेश आपला वायुसेना दिवस साजरा करतो!

वायुसेनाप्रमुख एयर चीफ मार्शल पी. सी. लाल

पाकिस्तानने ३ डिसेंबरच्या सायंकाळी भारताच्या पश्चिम सीमेवरील हवाईतळांवर हल्ला करताच आपण पश्चिम पाकिस्तानवर प्रतिहल्ला चढवला. पूर्व पाकिस्तानवर पहिला हल्ला करण्याचा मान मात्र भारताने 'किलो फ्लाईट'ला दिला!

त्या हल्ल्याबाबत गुप्तता टिकवण्यासाठी, भारताची औपचारिक युद्धघोषणा थोडी उशिरा करावी अशी विनंती, एयर चीफ मार्शल पी. सी. लाल यांनी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधींना केली. श्रीमती गांधींनी त्या विनंतीला मानही दिला! यामागे हेतु असा होता की, पूर्व पाकिस्तानी वायुसेना बेसावध राहावी आणि त्यांच्या विमानांना 'किलो फ्लाईट'च्या छोट्या विमानांवर प्रतिहल्ला करता येऊ नये. 

त्रिपुरामधल्या कैलासशहर विमानतळाच्या ३००० फुटी धावपट्टीवरून 'किलो फ्लाईट'च्या 'ऑटर' विमानाने, आणि जवळच्याच तेलीयामुरा विमानतळावरून 'चेतक' हेलिकॉप्टरने, ३ डिसेंबरच्या संध्याकाळी उड्डाण केले.

दोन्ही विमाने रात्रीच्या अंधारात आणि जवळपासच्या टेकड्यांपासून अतिशय कमी उंचीवरून उडत होती. पाकिस्तानी हवाईदलाला आपला सुगावा लागू नये हाच त्यांचा मुख्य हेतू होता. ती युद्धजन्य परिस्थिती होती म्हणूनच 'किलो फ्लाईट'च्या शूर वैमानिकांनी, कोणत्याही यांत्रिक अथवा मानवी मार्गदर्शनाशिवाय, ते 'आंधळे' उड्डाण करण्याचे धाडस केले. एरवी अशा प्रकारचे उड्डाण करण्याची कल्पनाही कोणी करू शकणार नाही!

तुटपुंज्या शस्त्रास्त्रांसहित, आणि अतिशय कमी वेगाने उडत चाललेल्या त्या विमानांची अवस्था अक्षरशः 'अंधार माझा सोबती' अशीच होती! आपल्या मायभूमीला जुलमी पाकिस्तानी राजवटीतून मुक्त करण्याची विजिगीषा उराशी बाळगलेल्या त्या हवाई योद्ध्यांचे असामान्य साहस हीच काय ती एकमेव जमेची बाजू होती.

'ऑटर' विमान

पाकिस्तानच्या विमानवेधी तोफांचा थोडासा भडिमार त्या दोन्ही विमानांवर झाला, पण  त्यातून ती बचावली. सुदैवाने, पाकिस्तानी विमाने मात्र त्यांच्या मागावर धावली नाहीत. 'ऑटर' विमानाने चितगांव (Chittagong) येथील तेलशुद्धीकरण कारखान्यातल्या तेलसाठ्यांना आग लावली, तर नारायणगंज येथील तेलाच्या टाक्या पेटवून येण्यात 'चेतक' हेलिकॉप्टर यशस्वी ठरले.

दोन्ही विमाने भारतात सुखरूप पोहोचून विमानतळांवर उतरायच्या आतच, पाकिस्तानी तेलसाठ्याची दोन महत्वाची ठिकाणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची सुवार्ता BBC रेडिओने जाहीर केली होती!

नारायणगंजचे तेलसाठे उद्ध्वस्त होताना 
(
ग्रुप कॅप्टन देब गोहाइन यांनी रेखाटलेले कल्पनाचित्र) 

बांगलादेशचा जन्म होण्याआधीच त्यांच्या नवजात हवाईदलाने आपली पहिली कामगिरी अतिशय नेत्रदीपकरीत्या फत्ते केली!

आधीच ठरल्याप्रमाणे, 'किलो फ्लाईट'चा हल्ला यशस्वी झाल्या-झाल्या, म्हणजे ३ डिसेंबरच्या मध्यरात्री, पाकिस्तानविरुद्ध युद्ध पुकारल्याची औपचारिक घोषणा भारताने केली.

४ डिसेंबरच्या पहाटेपासून पूर्वेकडील हवाई हल्ल्याची सर्व सूत्रे भारतीय वायुसेनेने आपल्या हातात घेतली. पुढे काय-काय घडले? 

पुढील लेखात... 


मूळ इंग्रजी लेखक: विंग कमांडर अविनाश चिकटे (सेवानिवृत्त) www.avinashchikte.com 
हा लेख खालील लिंकवर प्रकाशित झाला आहे. 

मराठी अनुवाद: कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ९४२२८७०२९४

(लेखातील सर्व छायाचित्रे indiatimes.com च्या सौजन्याने) 

16 comments:

  1. मानसिकता आणि देशप्रेम महत्त्वाचे.

    ReplyDelete
  2. अंतःप्रेरणा हीच कोणत्याही विजयाची पहिली पायरी आहे . संकट किती मोठे आहे हे महलवाचे नाही तर अंतःप्रेरणा किती प्रखर आहे हे महत्त्वाचे आहे

    ReplyDelete
  3. A gripping account of the nascent Bangladesh Airforce. Thanks for the story of kilo flight Colonel. What a curtain raiser! Kudos to the brave air warriors who inflicted major damages to Pak military.
    Milind Ranade

    ReplyDelete
  4. Kudos to the brave air-fighters. Bangladeshi Air force made a winning start!

    ReplyDelete
  5. Very nice narration and touching facts sir

    ReplyDelete
  6. Great strategy by IAF and BAF

    ReplyDelete