Monday 16 November 2020

'१ डोगरा' पलटणीचा वाघ


भारतीय सेनाधिकाऱ्यांच्या ट्रेनिंग अकादमीमध्ये कॅडेट्सना कवायत शिकविण्यासाठी जे हवालदार आणि सुभेदार हुद्द्यावरचे ड्रिल उस्ताद असतात त्यांच्याबद्दल कोणाही अधिकाऱ्याला विचारा. तुम्हाला भरभरून प्रशंसाच ऐकायला मिळेल. 

आर्मीच्या सर्वच रेजिमेंट्समधून ड्रिल उस्तादांची निवड होत असते. परंतु, प्रामुख्याने इन्फंट्री बटालियन्समधून येणारे उस्ताद अधिक असतात. कित्येक महिन्यांच्या कठोर प्रशिक्षणानंतर आणि अतिशय कठीण अशा निवडप्रक्रियेतून पार पडलेले उस्तादच अकादमींमध्ये पाठवले जातात. 'सुभेदार मेजर' हुद्द्यावरच्या, आणि जबरदस्त व्यक्तिमत्त्व असलेल्या  एका व्यक्तीच्या हाताखाली हे सगळे ड्रिल उस्ताद काम करतात. उस्तादांचा कॅडेट्सवर असलेला प्रभाव पाहता, असेही म्हणता येईल की अकादमीचे सर्व कामकाज या लोकांमुळेच सुरळीत चालते. अकादमीत कॅडेट म्हणून दाखल झालेल्या सिव्हिलियन 'पोराटोरांचे' रूपांतर, सक्षम सेनाधिकाऱ्यांमध्ये करण्याची किमया, हे उस्ताद ‘ड्रिल, शिस्त आणि दंडुका’ या त्रिसूत्रीचा आधारे लीलया करतात! त्यांच्या योगदानाचे महत्व पटवण्यासाठी एकच गोष्ट सांगणे पुरेसे आहे - कालची 'पोरेटोरे' जेंव्हा प्रशिक्षित अधिकारी बनून अकादमीतून बाहेर पडतात, तेंव्हा त्यांच्यावर विसंबून, आणि त्यांनी दिलेल्या आदेशाबरहुकूम, अनेक जवान आपल्या प्राणांची बाजी लावायला तयार असतात!

सगळेच ड्रिल उस्ताद 'एक से बढकर एक' असले तरी काही-काही उस्ताद विशेष छाप सोडून जातात. सुभेदार रघुनाथ सिंह हे तशा नामांकित उस्तादांपैकीच एक!

'इन्फंट्री स्कूल' या अधिकारी प्रशिक्षण संस्थेतला कामाचा अनुभव गाठीशी असलेले एक अनुभवी ट्रेनर, आणि १९६५च्या भारत-पाक युद्धात पराक्रम गाजवलेले सुभेदार रघुनाथ सिंह, १९६८ साली राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) मध्ये बदलीवर आले. त्यानंतर पुढील अडीच-तीन वर्षे, 'E' स्क्वाड्रनमध्ये ट्रेनिंग घेत असलेल्या आम्हा कॅडेट्सचे ते ड्रिल उस्ताद होते. 
सुभेदार रघुनाथ सिंहांना सैनिकी पेशाची पार्श्वभूमी होती. स्वतःच्या पूर्वजांविषयी त्यांना रास्त अभिमानही होता. सुप्रसिद्ध '१ डोगरा बटालियन', आणि १९६५च्या युद्धात त्या पलटणीतील आपल्या सहकाऱ्यांसह पाक सैन्याशी लढताना रघुनाथ सिंहांनी कमावलेले 'वीर चक्र', याविषयी ते बोलू लागले की, त्यांच्या डोळ्यात आम्हाला एक विशेष चमक जाणवत असे. 
सुभेदार रघुनाथ सिंहांच्या ट्रेनिंगचा आम्हा सर्वांवर जबरदस्त प्रभाव पडला. ‘इज्जत, नाम, नमक, निशान’ ही मूल्ये त्यांनीच आम्हाला शिकवली!

१९६५च्या युद्धात  रघुनाथ सिंहांनी केलेल्या कामगिरीची कहाणीही मोठी विलक्षण आणि आश्चर्यकारक होती. ११ सप्टेंबर १९६५ रोजी, 'असल उत्तर'च्या युद्धभूमीवर झालेल्या लढाईदरम्यान, तत्कालीन हवालदार रघुनाथ सिंह आपल्या प्लाटूनच्या एकूण ३५-४० जवानांपैकी जिवंत राहिलेल्या १८ जवानांचे नेतृत्व करीत पुढे निघाले होते. जवळच एका ऊसाच्या शेतामध्ये, एक मोठी आणि शस्त्रसज्ज पाकिस्तानी तुकडी लपली असल्याची माहिती त्यांना मिळाली. आपल्यापेक्षा खूपच बलाढ्य शत्रूशी आता गाठ पडणार हे हवालदार रघुनाथ सिंहानी ओळखले. पण विलक्षण प्रसंगावधान आणि प्रचंड आत्मविश्वास या त्यांच्या गुणांची प्रचिती त्यांच्या हाताखालच्या जवानांना तात्काळ आली.
 
जणू काही हाताखाली २-३ प्लाटून आहेत अशा थाटात, हवालदार रघुनाथ सिंहांनी मोठ्याने ओरडत आदेश द्यायला सुरू केले. "नंबर १ प्लाटून, बाएँ से घेरा डालो, नंबर २ प्लाटून दाहिने से आगे बढ़ो, बाकी जवान मेरे साथ हमले के लिए तैयार हो जाओ..."  
त्यापाठोपाठच, शेतात लपलेल्या शत्रूला जीव वाचवण्यासाठी शरण येण्याचे आवाहन करत, एक 'शेवटची संधी'ही त्यांनी दिली!
 
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हवालदार रघुनाथ सिंहांची ती युक्ती यशस्वी झाली. शेतात लपलेली पाकिस्तानी टोळी आपले अवसान गमावून, हात वर करत आत्मसमर्पणासाठी बाहेर आली!

एकही गोळी न झाडता, हवालदार रघुनाथ सिंहानी पाकिस्तानच्या रणगाडा दळाच्या चौथ्या कॅव्हलरी (4th Cavalry) बटालियनचे कमांडिंग ऑफिसर, लेफ्टनंट कर्नल नाझीर अहमद, त्यांच्या खालोखाल असलेले तीन अधिकारी आणि एकूण १७ पाकिस्तानी सैनिक ताब्यात घेतले. त्या पाकिस्तानी युनिटचे संपूर्ण वरिष्ठ नेतृत्वच अशा पद्धतीने भारतीय सैन्याच्या ताब्यात आल्यामुळे ती पलटण पूर्णपणे सैरभैर झाली आणि एक मोठाच विजय भारताला मिळाला. 

आम्ही तरुण कॅडेट्स, या शौर्यगाथेने मोहित होऊन सुभेदार रघुनाथ सिंहांचे अक्षरशः 'फॅन' झालो होतो. रघुनाथ सिंह हा एक साधा-सरळ सैनिक होता. त्यांनी हा प्रसंग काहीही तिखट-मीठ न लावता, जसा घडला तसाच आम्हाला सांगितला होता. आम्हाला मात्र हे भान निश्चितच होते की आम्ही एका खऱ्या-खुऱ्या योद्ध्याने रचलेला इतिहास त्याच्याच तोंडून ऐकत होतो! आमच्या संस्कारक्षम मनांवर या प्रसंगाचा काय परिणाम झाला असेल याची कल्पना इतरांना येणे कठीण आहे. 

काही वर्षांनंतर, आम्ही ट्रेनिंग संपवून आपापल्या बटालियनमध्ये दाखल झालो आणि जवळजवळ लगेच, १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या रणांगणात उतरलो. सुभेदार रघुनाथ सिंह यांनाही NDA मधून पुन्हा त्यांच्या बटालियनमध्ये पोस्टिंगवर पाठवले गेले.

रघुनाथ सिंहांची '१ डोगरा' ही पलटण त्यावेळी शकरगड सेक्टरमध्ये तैनात होती. १५ डिसेंबर रोजी, सातव्या कॅव्हलरी (7th Cavalry)  या आपल्या रणगाडा दलाच्या पलटणीने पाकिस्तानच्या एका मजबूत तळावर हल्ला चढवला. सुभेदार रघुनाथ सिंह, हे देखील त्यांच्या चार्ली कंपनीसह, या हल्ल्यात सामील होते. त्यानंतर झालेल्या घमासान युद्धात, पाकिस्तानी विमाने युद्धभूमीवर झेपावली. उघड्या मैदानात शत्रूला भिडू पाहणाऱ्या आपल्या सैनिकांवर पाकिस्तानी विमानातून मशीनगनच्या गोळ्यांचा अक्षरशः वर्षाव झाला. त्यातल्याच काही गोळ्या सुभेदार रघुनाथ सिंहांनी आपल्या छातीवर झेलल्या.  

१९६५ मध्ये वीर चक्र प्राप्त करणारा '१ डोगरा' चा वाघ, “ज्वाला माता की जय”,  हा आपल्या पलटणीचा जयघोष ओठांवर  घेऊन जो कोसळला तो पुन्हा कधीही न उठण्यासाठीच! 

आमचा 'आदर्श ड्रिल उस्ताद'आम्हाला परत भेटणार नव्हता! 


"जरी रणांगणावर पडलो शर्थ करोनी,

हे दृश्य विलक्षण जातो घेऊन नयनी,

गगनास भिडविला आम्ही आज तिरंगा 

'व्यर्थ न हे बलिदान',आईला सांगा ”

-----------------------------------------------------------------------------------------

मूळ इंग्रजी अनुभव : लेफ्टनंट जनरल शंकर रंजन घोष [सेवानिवृत्त]

मराठी भावानुवाद आणि समारोपाची काव्यरचना : कर्नल आनंद बापट [सेवानिवृत्त] ९४२२८७०२९४

Thursday 1 October 2020

ऐ वतन, मेरे वतन...

बारा-चौदा वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. इंदौरमधल्या एका नामवंत शाळेत, आठवड्याभराची कार्यशाळा संपवून मी रेल्वेने मुंबईला परत निघाले होते. 

एसी २-टियरच्या डब्यात, पॅसेजमधला खालचा बर्थ मला मिळाला होता. सूटकेस बर्थखाली ठेवून आणि हँडबॅग खुंटीला लटकावून, हुश्श म्हणत मी बसले. रात्रभराच्या शांत झोपेची मला नितांत गरज होती.

आतील बाजूच्या कूपेमधले चारही प्रवासी आधीच आलेले होते. दोन पुरुष आणि दोन स्त्रिया. एकंदर सोबत तर ठीकठाक वाटत होती. त्या दोन पुरुषांपैकी, वयाने लहान असलेल्या पुरुषाचा चेहरा एका बाजूने वाकडा आणि ओबडधोबड होता. केसही अगदी बारीक कापलेले होते. एकंदरीत, तो दिसायला जरा विचित्रच होता. पण त्याच्याकडे फार काळ रोखून पाहणे वाईट दिसेल, म्हणून मी नजर वळवली. 

एकदाची गाडीत बसून स्थिरावल्यावर, मी मोबाईल बाहेर काढला. नौदल अधिकारी असलेल्या माझ्या नवऱ्याला, माझी हालहवाल, (म्हणजे नौदलाच्या भाषेत, SITREP किंवा Situation Report) कळवणे आवश्यक होते. माझे वडील, सासरे, आणि नवरा अशा तीन 'फौजी' लोकांसोबत अनेक वर्षे राहिल्यामुळे, सैन्यदलात वापरले जाणारे कित्येक शब्द माझ्या बोलण्यात आपसूकच येतात!

मी फोनवर बोलत असताना, दणकट शरीरयष्टीचे तीन तरुण आले आणि काहीही न बोलता-विचारता खुशाल माझ्या बर्थवर बसले. नवऱ्याला फोन चालू ठेवायला सांगून मी त्या तरुणांकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले. त्यांच्यापैकी एकाने वरच्या बर्थकडे बोट करून, तो बर्थ त्याचा असल्याचे मला खुणेनेच सांगितले. तात्पुरते समाधान झाल्याने मी पुन्हा नवऱ्यासोबत बोलू लागले. 

त्या तिघांनी, आपसात गप्पा आणि हास्यविनोद करत-करत, हळू-हळू माझ्या बर्थवरची बरीच जागा बळकवायला सुरुवात केली. अंग चोरून बसता-बसता, शेवटी बर्थच्या एका कोपऱ्यात माझे मुटकुळे झाले. मग मात्र मी फोन बंद केला आणि त्या तिघांना उद्देशून सांगितले की मला आडवे पडायचे असल्याने त्यांनी आता माझ्या बर्थवरून उठावे. त्यांच्यापैकी एकाने, बर्थच्या वर लिहिलेली नोटीस बोटानेच मला दाखवली आणि म्हणाला, "रात्री नऊनंतरच बर्थ झोपण्यासाठी वापरता येतो. तोपर्यंत त्यावर बसूनच राहावे असा नियम आहे."

त्याला चांगले खरमरीत उत्तर मी देणारच होते. पण कुणाला काही कळायच्या आत, कूपेमधला तो विचित्र चेहऱ्याचा मनुष्य उठून माझ्या शेजारी येऊन उभा राहिला. कमालीच्या थंड नजरेने त्या तिघांकडे पाहत, अतिशय मृदू आवाजात, व सौम्य शब्दात, त्याने त्या तिघांनाही दुसऱ्या डब्यात निघून जाण्यास सांगितले. त्यांपैकी एकजण उलटून त्याला काही बोलण्याच्या तयारीत होता. पण माझ्या त्या 'रक्षणकर्त्या' च्या थंड नजरेतली जरब त्याला जाणवली असावी. तिघेही मुकाट्याने उठून चालते झाले. 

मी "थँक यू" म्हणताक्षणी त्याच्या तोंडून आलेल्या, "Not at all, Ma'am" या वाक्यामुळे, तो फौजी असणार हे मी बरोबर ताडले. तरीही खात्री करून घेण्यासाठी मी विचारले, "तुम्ही सैन्यदलात आहात का?" 

"होय, मॅडम. मी इन्फन्ट्री ऑफिसर आहे.  महूला एका छोट्या ट्रेनिंग कोर्सकरिता आलो होतो."

"अच्छा. माझे मिस्टर नौदलात आहेत. माझे वडील आणि सासरे आर्मीमध्ये होते."

सहजपणे आमच्या गप्पा सुरु झाल्या. देशातील एकंदर वातावरण, आणि विशेषतः काश्मीरमधल्या परिस्थितीकडे आपसूकच बोलण्याचा ओघ वळला. एक-एक करीत इतर सहप्रवासीदेखील आमच्या गप्पात सहभागी झाले. त्या सगळ्यांपैकी कोणीही दिल्लीच्या पुढे उत्तरेला कधीच गेलेले नसल्याने, माझ्यापेक्षा त्यांनाच काश्मीर खोऱ्यातील 'आँखोंदेखी' ऐकण्यात अधिक रस होता. पुढचे दोन-तीन तास, अक्षरशः आपापल्या जागेवर खिळून, आम्ही त्या मेजरचे एकेक थरारक अनुभव ऐकत राहिलो. (त्या मेजरचे नाव मी सांगू इच्छित नाही). 

ट्रेनिंग संपवून ज्या दिवशी तो युनिटमध्ये अधिकारी म्हणून दाखल झाला, त्याच दिवशी त्याच्या हातून एक मनुष्य (अर्थातच पाकिस्तानी अतिरेकी) मारला गेला होता, आणि तोही अगदी काही फुटांच्या अंतरावरून! 

ती कारवाई संपल्यानंतर मात्र, जेमतेम २०-२२ वर्षांच्या त्या तरुण अधिकाऱ्याचे मन अक्षरशः सैरभैर होऊन गेले होते. युनिटमधल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याची अवस्था ओळखून, त्याची काळजी घेतली आणि योग्य शब्दात त्याची समजूत घातली. एक सेनाधिकारी म्हणून स्वतःचे कर्तव्य पार पाडताना, त्याला अशा अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागणार आहे याची त्याला जाणीव करून दिली. जणू काही अर्जुनाला भगवान श्रीकृष्णच भेटले! 

युनिटमधल्या सर्व अधिकारी व जवानांमध्ये असणारा बंधुभाव आणि एकमेकांवरचा विश्वास लाखमोलाचा असतो हे त्या मेजरने आम्हाला आवर्जून सांगितले. कारण, याच  भावना आणि हेच  घनिष्ट  परस्परसंबंध, अनेक वेळा जीवन आणि मृत्यू यांच्यामध्ये अभेद्य भिंत बनून उभे राहतात!


मला जाणवले की तो मेजर खराखुरा हाडाचा सैनिक होता. "सैनिकाने लढताना नीतिमत्ता विसरता कामा नये" हे वाक्य बोलताना त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. उदाहरण म्हणून, कारगिल युद्धातली एक सत्य घटना त्यानेे सांगितली.

एका चकमकीत, त्याच्या युनिटच्या जवानांनी पाकिस्तानी घुसखोर सैनिकांच्या चौकीला वेढा घातला होता. बराच वेळ धुमश्चक्री सुरु होती. शेवटी, निकराचा हल्ला चढवून भारतीय सैनिकांनी पाकिस्तान्यांचा कडवा प्रतिकार मोडून काढला. चौकीमध्ये पाकिस्तानी सैनिकांची प्रेते इतस्ततः पडलेली होती. भारतीय हद्दीत छुपी घुसखोरी केलेली असल्याने त्या सैनिकांच्या अंगावर युनिफॉर्मऐवजी स्थानिक रहिवाश्यांसारखेच कपडे होते. मात्र, हे आपल्या आयुष्यातले शेवटचेच युद्ध असल्याचे ओळखून, मुलकी कपड्यांमधल्या त्या प्रत्येक सैनिकाने छातीवर आपापली पदके लावलेली होती! एक सच्चा सैनिक म्हणून वीरमरण पत्करण्यासाठी त्यातला प्रत्येकजण सज्ज होता!

चौकीवर विजय मिळवल्यानंतर या भारतीय मेजरने सर्वप्रथम, पाकिस्तानी सैनिकांच्या ओळखपत्रांवरून प्रत्येकाची ओळख पटवली. एका पत्राद्वारे त्या नावांची यादी पाकिस्तानी सेनेकडे पाठवून, त्या सर्व मृत सैनिकांचा यथोचित सन्मान व्हावा अशी इच्छा त्याने व्यक्त केली! 

काही काळानंतर त्याला समजले की त्याच्या विनंतीनुसार, पाकिस्तानी सैन्याकडून त्या शहीदांचा सन्मान केला गेला होता!   

त्याच युद्धात, बॉम्बचा तुकडा गालफडात घुसल्यामुळे त्याचा चेहरा असा विचित्र, आणि ओबड-धोबड झालेला होता, हेही सहजच बोलल्यासारखे त्याने सांगितले. इतकेच नव्हे तर, त्याच्या मणक्यांमध्ये आणि पायांमध्ये शस्त्रक्रियेद्वारे रॉड बसवलेले होते. म्हणूनच, सोबतच्या महिला सहप्रवाश्यांना तो स्वतःचा खालचा बर्थ देऊ शकला नव्हता हेही त्याने काहीश्या दिलगिरीच्या स्वरातच सांगितले! 

आर्मीच्या डॉक्टरांचे तो तोंड भरून कौतुक करीत होता. "माझे फाटलेले थोबाड छान शिवून मला एक नवीन चेहरा त्यांनीच तर दिला ना!" हे म्हणताना त्याच्या चेहऱ्यावर दुःखाचा लवलेशही नव्हता. त्याउलट, एक मिश्किल भावच मला जाणवला! मी थक्क होऊन त्याच्याकडे पाहत होते. त्याच्या त्या बदललेल्या चेहऱ्याबद्दल घरच्या मंडळींना काय वाटले? असे आम्ही विचारताच तो हसून म्हणाला, "माझी बायको, आणि आमची सहा वर्षांची मुलगी म्हणतात, आता मी पहिल्यापेक्षा जास्त देखणा दिसतो!"

काश्मिरातल्या खेड्या-पाड्यांमधल्या घरात लपून बसलेले अतिरेकी शोधणे आणि त्यांना ठार करणे, हे त्याच्या मते सगळ्यात अवघड काम होते. (त्यावेळी नुकताच मुंबईवर अतिरेकी हल्ला होऊन गेला होता.  सैन्यदलाच्या आणि नौदलाच्या कमांडो सैनिकांनी 'ताज' हॉटेलमध्ये आणि इतरत्र केलेली कारवाई माझ्या डोळ्यांसमोर उभी राहिली). 

"Cordon & Search कारवाई म्हणजे एक जीवघेणा लपंडावाचा खेळ असतो. त्यामध्ये आमच्या सतर्कतेची आणि संयमाची अक्षरशः अग्निपरीक्षाच असते. अशा कारवाया बहुदा रात्रीच्या अंधारातच होतात. संपूर्ण खेड्याला आम्ही वेढा घालतो आणि एकेक घर तपासत जातो. अतिरेकी नेमका कुठे लपला असेल याचा पत्ता लावायचा असतो. त्याला बेसावध गाठून आम्ही ठार करणार, की तोच आधी आमचा वेध घेणार हे मात्र 'काळ'च ठरवतो!"

मेजर शांतपणे बोलत राहिला, "आम्ही आता पूर्वीपेक्षा अधिक अनुभवी झालो आहोत.  पण, अतिरेकीसुद्धा अधिक शहाणे झाले आहेत. ते आता आमच्या डोक्यावर किंवा छातीवर नेम धरत नाहीत. मांड्यांवर गोळ्या झाडतात. मांडीमधली रक्ताची धमनी फुटलेल्या सैनिकाला तातडीने हॉस्पिटलात न्यावेच लागते. नाही तर अत्यधिक रक्तस्त्रावाने त्याचा मृत्यू होऊ शकतो. त्या जवानाला सुखरूपपणे हलवण्यात आमचे मनुष्यबळ आणि वेळ खर्च होतो आणि अतिरेक्यांना नेमके तेच हवे असते." 

ऐकता-ऐकता आमच्या डोळ्यावरची झोप केंव्हाच उडून गेली होती. मी आणि इतर सहप्रवासी अचंबित होऊन, जणू तो थरार प्रत्यक्ष अनुभवत होतो. 

मी सहज त्याला विचारले, "अतिरेक्यांविरुद्धच्या तुझ्या कामगिरीबद्दल तुला एखादे शौर्यपदक मिळाले असेल ना?"

"नाही, मॅडम."

मी आश्चर्यानेच विचारले, "का बरं? का नाही मिळालं?"

"मॅडम, मी जे केलं, ते करणाऱ्या प्रत्येकाला जर आर्मीने शौर्यपदक देणं सुरु केलं, तर पदकांचा स्टॉकच संपून जाईल!" तो हसत-हसत म्हणाला. 

त्याच्या या अनपेक्षित उत्तराने आम्ही सगळेच अवाक झालो होतो. आमच्या मते जे अतुलनीय शौर्य होते, ती त्याच्या दृष्टीने जणू एखादी सामान्य घटनाच होती. 

कदाचित, जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांसोबत लढणाऱ्या प्रत्येक सैनिकाचे आणि अधिकाऱ्याचे तेच दैनंदिन जीवन असेल! 

निःस्वार्थ सेवा म्हणजे काय, ते मला माझ्या डोळ्यासमोर, मूर्तस्वरूपात दिसत होते, आणि मी ते रूप मनात साठवून घेत होते.  

एका सहप्रवाशाने अचानकच विचारले, "कुठून येते ही एवढी प्रेरणा तुम्हा लोकांमध्ये?"

"या देशावर, देशवासीयांवर असलेले प्रेम, आणि मी एक भारतीय असल्याचा सार्थ अभिमान. आणखी काय?"

अगदी सहजपणे त्याने उच्चारलेले ते वाक्य ऐकून माझ्या सर्वांगावर रोमांच उभे राहिले. मला माझे लहानपण आठवले. त्या काळी, सिनेमा संपल्यावर राष्ट्रगीत वाजत असे. आम्ही सगळे उठून उभे राहायचो. स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन हे निव्वळ मौजमजा करण्याचे, सुट्टीचे दिवस नव्हते. आम्ही सकाळी आनंदाने घराबाहेर पडायचो, आणि अभिमानाने ध्वजवंदन करायचो. "जय जवान, जय किसान" हे वाक्य उच्चारत, मातृभूमीच्या त्या दोन सच्च्या सेवकांना मनापासून अभिवादन करायचो. 

आजदेखील जवानांची आणि किसानांची आपल्या देशाला पूर्वीइतकीच नितांत गरज आहे. मला खात्री आहे की आपल्या सर्वांच्या मनात, खोल कुठेतरी, त्यांच्याबद्दलचा आदर आणि अभिमान दडलेलाही आहे. मात्र, तो मनातच न ठेवता, बाहेर काढून, झाडून, झटकून, छातीवर मिरवायची आज गरज आहे. आपल्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यासोबत त्याची जाणीव आपल्याला होत राहिली तरच आपल्या वागण्या-बोलण्यातही तो आदर दिसत राहील. 

"... मी एक भारतीय असल्याचा सार्थ अभिमान. आणखी काय?"

"जय हिंद"

___________________________________________________________________________________

मूळ इंग्रजी अनुभवलेखिका : सौ. स्मिता (भटनागर) सहाय. [भारतीय नौदलातील कॅप्टन सहाय यांच्या पत्नी]

मराठी भावानुवाद : कर्नल आनंद बापट [सेवानिवृत्त]

Tuesday 18 August 2020

मेरे से ज्यादा कौन जानता होगा?

मेरे से ज्यादा कौन जानता होगा?

कदाचित शंभर वेळा जावेदचे आभार मानून झालेले होते, तरीही मी पुन्हा एकदा जावेदजवळ गेलो, त्याला कडकडून मिठी मारली आणि म्हणालो, "थँक्स जावेद! माझे हात तू वाचवलेस!"

सियाचिन ग्लेशियर, या जगातील सर्वाधिक उंचीवरच्या युद्धभूमीवरचा आमचा कार्यकाळ पूर्ण करून, आम्ही नुकतेच ग्लेशियरच्या पायथ्याशी असलेल्या बेस कॅम्पवर पोहोचलो होतो.

"सर, बार-बार थँक्यू बोलके शरमिंदा मत करो!" कसनुसं हसत शिपाई जावेद मला म्हणाला.

"जावेद, तू असं म्हणतोयस कारण, कदाचित तुला कल्पना नाहीये, एखादा हात किंवा पाय गमावणं किती भयानक असू शकतं!"

"साब, इस बात को मेरे से ज्यादा कौन जानता होगा?"

माझ्या चेहऱ्यावर उमटलेले प्रश्नचिन्ह पाहून जावेद पुढे म्हणाला,
"साहेब, १९८९ साली माझे वडील याच सियाचिन ग्लेशियरवर तैनात होते. बर्फाच्छादित पर्वतावरून चालताना, एका घळीत पडून त्यांना गंभीर इजा झाली. त्यांचा जीव कसाबसा वाचला, पण त्यांचे दोन्ही पाय कापावे लागले. ते हॉस्पिटलात होते तेंव्हा मीच त्यांची देखभाल करायचो. दोन्ही पाय गमावल्यानंतरच्या त्या भयंकर मानसिक धक्क्यातून सावरायला मीच त्यांना मदत केली. त्यामुळे ते अपंगत्वाच्या भावनेवर मात करून, त्यांचे कोलमडलेले आयुष्य पुन्हा उभे करू शकले."

हे ऐकून, काही क्षण मी स्तब्ध झालो, आणि मग एकदम त्याला म्हणालो, "जावेद, मला सांग, तू सियाचिन ग्लेशियरवरचं हे अवघड फील्ड पोस्टिंग स्वतःहून का मागून घेतलंस? तुझी बटालियन तर सध्या पीस स्टेशनमध्ये आहे. तूही अडीच-तीन वर्षे तिकडेच आरामात राहू शकला असतास!"

"सर, माझे वडील नेहमी म्हणतात की प्रत्येक फौजीने एकदा तरी ग्लेशियरवर नोकरी केली पाहिजे. आमचं संपूर्ण कुटुंबच फौजी आहे सर. मला हे आव्हान स्वीकारायचंच होतं."

"तुझ्या आईने तुला अडवलं नाही?"

"तिनं अडवलं सर. पण माझे वडील म्हणाले, की जर तू व्यवस्थित काळजी घेतलीस तर तुला काहीही होणार नाही. आता तिथली परिस्थिती पूर्वीसारखी  राहिलेली नाही. आजकाल नवनवीन साधनं, उपकरणं, आणि पोशाख वापरायला मिळतात. ग्लेशियरवर पुष्कळ सोयीदेखील झालेल्या आहेत."

सहजच, गेल्या तीन महिन्यांमधला एकेक प्रसंग मी आठवू लागलो.
ग्लेशियरवर तैनात असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा एकेक जोडीदार (Buddy) ठरलेला असतो. जोडी-जोडीनेच राहायची, आणि सगळीकडे वावरायची पद्धत असते. माझा Buddy जावेदच होता. तो प्रत्येक गोष्ट नेमून दिलेल्या पद्धतीनुसारच करीत असे. मात्र ती त्याच्या वडिलांची शिकवण होती, हे त्याच्याकडून आता नुकतेच मला समजले होते. कधी-कधी तर तो मला सौम्य शब्दात झापायचाही, आणि ग्लेशियरवरचे ठराविक 'ड्रिल' पाळायला लावायचा.

ग्लेशियरवरच्या उणे ३०-४० अंश तापमानामुळे, एकदा माझ्या हातांना 'Chilblain' झाले.

Chilblain, या आजारामध्ये, बोटांतल्या लहान-लहान रक्तवाहिन्या फुटतात आणि बोटांमध्ये रक्त साकळते. बोटे सुजून लाल होतात, असह्य खाज सुटते आणि तीव्र वेदनांमुळे मनुष्य बेजार होतो.
वेळीच त्यावर प्रतिबंधक उपाय किंवा उपचार न केल्यास बोटे सडून, झडून जाऊ  शकतात.
आमची एकमेव लाईफलाईन असलेले हेलिकॉप्टर, खराब हवामानामुळे ग्लेशियरवर उतरू शकत नव्हते. त्यामुळे मला हॉस्पिटलमध्ये हलवणे लांबणीवर पडत होते.

दहा दिवसांनंतर जेंव्हा हेलिकॉप्टर आले, तोपर्यंत आमच्या एका जवानाला High Altitude Pulmonary Oedema (HAPO) चा त्रास सुरु झालेला होता. या आजारात फुफ्फुसातील रक्तवाहिन्यांमधून पाणी बाहेर झिरपते आणि फुफ्फुसात भरते. श्वासोच्छ्वास कमी-कमी होत जातो आणि मनुष्य दगावू शकतो. एका जवानाचा जीव वाचवणे किंवा माझ्या हाताची बोटे वाचवणे, यापैकी एकच काहीतरी, एका वेळी करणे शक्य होते. अर्थातच, मला ग्लेशियरवर सोडून, त्या जवानाला हेलिकॉप्टरमधून नेले गेले.

त्या दहा दिवसात जावेदनेच माझी शुश्रूषा केली. स्वहस्तेच करण्याची, माझी अक्षरशः सर्वच्यासर्व कामे, तो आपल्या हाताने करीत असे! माझ्या हातांना ऊब पुरवण्याची आणि कोरडे ठेवण्याची दक्षता तो घेई. हळू-हळू माझ्या बोटांवरची सूज उतरत गेली. जर Chilblain बळावले असते तर गँगरीन होऊन, अगदी माझे हात नाही तरी, दोन्ही हातांची काही बोटे मी निश्चितच गमावली असती. 

ही सगळी चित्रमाला माझ्या मनातून सरकत असतानाच, माझ्या दोन्ही हातांची सर्व बोटे मी हलवून पाहत होतो. सियाचिनवरचा कार्यकाळ संपवून, हाती-पायी धडधाकट अवस्थेत मी परत निघालो होतो, आणि याचे श्रेय निःसंशय जावेदलाच होते.

मी बेस कँपच्या ऑफिसर मेसकडे चालत निघालो. सियाचिन ग्लेशियरवरच्या सर्वात दुर्गम पोस्टवर, अतिशय खडतर परिस्थितीत सेवा बजावून मी परतलो होतो. एखाद्या हिरोसारखे माझे स्वागत झाले. CO साहेबांनी अतिशय उत्साहात माझ्यासोबत हस्तांदोलन केले. इतर अधिकारी माझ्यासाठी ड्रिंक हातात घेऊन सरसावले. पण मला मात्र काहीच खायची-प्यायची इच्छा होईना.
माझे मन सारखे जावेदच्या वडिलांकडे धाव घेत होते. स्वतःचे दोन्ही पाय गमावल्यानंतरही आपल्या मुलाला सियाचिनसारख्या ठिकाणी सेवा बजावण्यासाठी प्रोत्साहित करणारा तो सैनिक निश्चितच एक थोर माणूस होता.

माझे अभिनंदन करणाऱ्या अधिकाऱ्यांचे शब्दही माझ्या कानात शिरत नव्हते.

ग्लेशियरवर अधूनमधून हिमप्रपात (Avalanche) होत असत. अशाच एका हिमप्रपातामध्ये, जसबीरसिंग नावाच्या शिपायाने आपला जीव गमावला होता. त्याची आठवण मला अस्वस्थ करीत होती. सदैव उत्साहाने भारलेल्या जसबीरसिंगचा चेहरा राहून-राहून माझ्या डोळ्यांसमोर येत होता.
त्याचे शब्द जणू मला ऐकू येत होते, "साबजी, घरी पोहोचल्या-पोहोचल्या मी पल्सार बाईक विकत घेणार आणि तडक अमृतसरच्या हरमंदिर साहिबपुढे माथा टेकायला जाणार आहे!"
पण आज कुठे होता आमचा जसबीर?

सलग ९० दिवसांनंतर प्रथमच मी दाढी आणि आंघोळ केली! आरश्यात स्वतःचे रूप पाहताना मनात संमिश्र भावना होत्या. ग्लेशियरवरच्या जीवघेण्या हवामानामुळे झालेली त्वचेची अवस्था माझी मलाच बघवत नव्हती. वयाच्या सव्वीसाव्या वर्षी, कपाळापासून किमान एक इंच मागेपर्यंतचे केस झडून, मला टक्कल पडू लागले होते. पण, हात-पाय गमावण्याच्या तुलनेत हे काहीच नव्हते!

त्या रात्री जड अंतःकरणानेच मी अंथरुणावर पडलो. थोडाच वेळ झोपलो असेन. पहाटे तीनच्या सुमारास मला कुणीतरी उठवल्यामुळे मी धडपडत उठलो.
मला उठवणाऱ्या जवानाने सांगितले, "सर, जावेदला अचानक अस्वस्थ वाटू लागल्यामुळे, त्याला बेस कँपच्या हॉस्पिटलात न्यावे लागले आहे."

मी लगेच हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. रेस्पिरेटर लावलेल्या, आणि अनेक उपकरणे अंगाला जोडलेल्या अवस्थेत, कसाबसा श्वास घेत असलेला जावेद मला दुरूनच पाहता आला.
मला त्याला भेटायचे होते. जरी त्याची शुश्रूषा करता आली नाही तरी, निदान त्याचा हात माझ्या हातात घ्यायचा होता. पण, डॉक्टर मला त्याच्याजवळ जाऊ देईनात. त्यांनी मला इतकेच सांगितले की, जावेदला Cerebral Veinous Thrombosis  (मेंदूमधील रक्ताची गुठळी) चा अटॅक आला होता. दुसऱ्याच दिवशी त्याला विमानाने चंडीगढच्या कमांड हॉस्पिटलात हलवले गेले.

दहा दिवसानंतर, जावेद गेल्याची बातमी जेंव्हा मला मिळाली, तेंव्हा मी रजेवर होतो. माझ्या कानावर माझा विश्वासच बसेना. मी आमच्या युनिटच्या डॉक्टरला फोन करून विचारले, "डॉक्, प्रत्येक अन् प्रत्येक गोष्ट अक्षरशः नियमामध्ये लिहिल्याबरहुकूम करणाऱ्या जावेदला मृत्यूने गाठलेच कसे?"

डॉक्टरने मला शांतपणे समजावले.
सियाचिन ग्लेशियर आणि तिथले हवामान, हे एखाद्या कडव्या शत्रूपेक्षाही भयानक असतात. ते कोणाचा, केंव्हा आणि कसा घात करतील ते परमेश्वरच जाणे. समुद्रसपाटीपासून प्रचंड उंचीवर वाहणारे बर्फाळ वारे, जीवघेणी थंडी, प्राणवायूची कमतरता, आणि केवळ डबेबंद अन्न!तेदेखील फक्त शरीराला पोसण्यापुरते!

निसर्गरूपी शत्रूच्या या सैनिकांनी शरीरावर केलेले वार, ग्लेशियरवर असताना काय, किंवा त्यानंतरच्या आयुष्यातही काय, आपल्याला केंव्हा घायाळ करतील याचा काही नेम सांगता येत नाही. हे सर्व आपल्या भौतिक शक्तीपलीकडचेच नव्हे तर आपल्या कल्पनेच्याही पलीकडचे आहे. 

मला पूर्ण कल्पना होती की, सख्ख्या भावासारखे प्रेम ज्याच्यावर केले, अश्या आपल्या सोबत्याच्या हौतात्म्याची वार्ता घेऊन, त्याच्या आईवडिलांना भेटणे, ही एखाद्या सैनिकाच्या आयुष्यातली सर्वात मोठी परीक्षा असते. तरीही मी जावेदच्या घरी गेलो.
त्याच्या आईवडिलांसमोर माझ्या अश्रूंचा बांध फुटू नये म्हणून मी उसने अवसान आणले होते.
पण, परतीच्या वाटेवर मात्र, दुःखाने माझा श्वास कोंडतो की काय असे मला वाटू लागले.
पुन्हापुन्हा जावेदचे शब्द माझ्या कानात घुमायला लागले, "साबजी, मेरे रिश्तेमें एक लडकी है जिसको मैं तहेदिल से प्यार करता हूँ । अगली छुट्टीमें पक्का उसको मैं शादी के लिये पूछनेवाला हूँ ।"

एका निर्मनुष्य ठिकाणी मी माझी टॅक्सी थांबवली. ड्रायव्हरला सांगितले, "तू गाडीतून उतरून,  दूर कुठेतरी जाऊन, अर्धा तास थांब".

त्या अर्ध्या तासात मी अक्षरशः धाय मोकलून रडलो. अखेर एक सैनिकसुद्धा माणूसच असतो. त्याच्या डोळ्यातून पाणीच नव्हे, तर हृदयातून रक्ताचे अश्रूही वाहत असतात!

_______________________________

मूळ इंग्रजी अनुभवलेखन:
ब्रिगेडियर पी. एस. गोथरा (सेवानिवृत्त) 
मराठी भावानुवाद: 
कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)
abbapat@gmail.com/ 9422870294

Tuesday 11 August 2020

एका 'भगोड्या'ची गोष्ट !

१९७१ च्या युद्धात कामगिरी बजावल्यानंतरही आम्ही बराच काळ पाकिस्तान सीमेवरच तैनात राहिलो होतो.

आमचे तोफखाना दळाचे चौदावे फील्ड रेजिमेंट, जून १९७३ मध्ये जमशेदपूरला आले. Adjutant या पदावर मी अजून नवखा होतो. अत्यंत 'कडक' अशी ख्याती असलेले लेफ्टनंट कर्नल रामचंद्र परशुराम सहस्रबुद्धे हे आमचे कमांडिंग ऑफिसर (CO) होते. 

जमशेदपूरच्या टेल्को कंपनीमध्ये कामाला असलेला एक माजी सैनिक, गुरबचन सिंग, एके दिवशी सकाळी मला भेटायला आला. तसा तो आमच्या युनिटमध्ये वरचेवर येत असे. माजी सैनिक असल्याने, रेशन, दैनंदिन वापराच्या वस्तू आणि दारूच्या बाटल्या आर्मी कॅन्टीनमधून विकत घेण्याचा हक्क त्याला होता. त्याकरिता आवश्यक ती कागदपत्रेही त्याच्याकडे होती. टेल्कोच्या सर्व माजी सैनिकांच्या वतीने त्यांचा कोटाही तोच घेऊन जात असे. पंजाब रेजिमेंटचे, कर्नल ब्रार नावाचे एक सेवानिवृत्त अधिकारी टेल्कोच्या प्रशासन आणि सुरक्षा विभागाचे जनरल मॅनेजर होते. गुरबचन सिंग हा त्यांचा ड्रायव्हर होता. टेल्को व टिस्कोच्या इतरही महत्वाच्या अधिकाऱ्यांच्या मोटारीही तो क्वचित चालवीत असे. अर्थातच, एक निष्णात ड्रायव्हर असल्याने, टेल्को (टाटा मोटर्स) आणि टिस्को (टाटा स्टील) अश्या मातबर कंपन्यांसाठी तो एक मोलाचा कर्मचारी होता.  

आमच्या युनिटसोबत संलग्न असलेल्या, 'इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनियर्स' (EME) या विभागाच्या सर्व सैनिकांशी गुरबचन सिंगचा परिचय होता. तसेच, आमच्या रेजिमेंटचे नायब सुभेदार/सुभेदार पदावरील ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर (JCO), आणि नाईक/हवालदार पदावरचे नॉन कमिशन्ड ऑफिसर (NCO), हे सगळेच त्याला ओळखत होते. एरवी त्याचा संबंध मुख्यतः आमच्या युनिटच्या क्वार्टर मास्टर (QM)सोबतच येत असल्याने, मी त्याला पूर्वी कधी पाहिलेले नव्हते. त्या दिवशी मात्र आमच्या QM ने गुरबचन सिंगला माझ्याकडे पाठवले, कारण त्याचे सर्व्हिस बुक एखाद्या सेनाधिकाऱ्याकडून सत्यापित करून घेणे आवश्यक झाले होते. 

गुरबचन सिंगची सर्व कागदपत्रे, आणि त्यालाही सोबत घेऊन आमचे हेडक्लार्क माझ्याकडे आले. माझ्या नावाचा व आमच्या युनिटचा शिक्का त्या कागदांवर छापणे आणि मी सही करणे, असे एखाद्या मिनिटात होण्यासारखे काम असल्याने, सर्व सज्जता करूनच हेडक्लार्क माझ्याकडे आले होते. परंतु, निव्वळ 'सह्याजीराव' बनून काम करणे मला मान्य नव्हते. मी गुरबचन सिंगच्या आर्मी सर्व्हिससंबंधी सखोल चौकशी केली. त्याने सांगितले की, तो पूर्वी EME मध्ये व्हेईकल मेकॅनिक (VM) होता. खात्री करून घेण्यासाठी, आमच्या लाईट रिपेअर वर्कशॉप (LRW) मधल्या VM ला बोलावून मी विचारले असता, त्यानेही मला सांगितले की प्रशिक्षणकाळात गुरबचन सिंग त्याचा बॅचमेट होता. 
ही सर्व चौकशी चालू असतानाच अचानक, CO साहेबांनी माझ्यासाठी बझर वाजवल्याने मला तातडीने त्यांच्याकडे जावे लागले.  
CO साहेबांच्या ऑफिसमधून परतल्यावर माझ्या मनात नेमके काय आले देव जाणे, पण मी गुरबचन सिंगच्या कागदांवर सही करण्यास नकार दिला. आमच्या युनिटचे सुभेदार मेजर आणि हेडक्लार्क हे दोघेही माझ्या निर्णयामुळे थोडेसे नाराज दिसले. त्यानंतर मी हेडक्लार्कना आदेश दिला की, सिकंदराबादजवळील त्रिमुलगेरी येथे असलेल्या EME सेंटरमध्ये, गुरबचन सिंगची सर्व कागदपत्रे पाठवून, त्यांची खातरजमा करून घेण्यात यावी. हे ऐकल्यानंतर मात्र, माझे डोके चांगलेच फिरले आहे, याबद्दल बहुदा आमच्या हेडक्लार्कची खात्रीच पटली असणार! प्रत्यक्ष युद्धाचा अनुभव जरी माझ्या गाठीशी असला तरीही, दैनंदिन कार्यालयीन कामात तसा मी नवखाच होतो. त्यामुळे, हे खबरदारीचे पाऊल उचलणे मला आवश्यक वाटले होते. 

"Adjutant साहेब सध्या व्यस्त आहेत पण यथावकाश तुझे काम होईल" असे काहीतरी गुरबचन सिंगला तात्पुरते सांगून हेडक्लार्कनी वेळ मारून नेली असावी. 

आमच्या युनिटकडून गेलेल्या पत्राला आठवड्याभरातच EME सेंटरमधून तारेने उत्तर आले. त्यामध्ये लिहिले होते, 
 "चीन सीमेवरील धोला-थागला जवळील चौकीवर तैनात असताना, २१ ऑक्टोबर १९६२ रोजी, चिनी हल्ला होताच, गुरबचन सिंग हा शिपाई शत्रूसमोरून पळून गेला होता. नंतर त्याचा काहीच ठावठिकाणा न समजल्याने, त्याला 'बेपत्ता किंवा मृत' घोषित केले गेले होते. आता तुम्हाला तो जिवंत सापडलेला असल्याने, त्याला त्वरित ताब्यात घेऊन आम्हाला कळवावे. आम्ही आरक्षी दल पाठवून त्याला आमच्या ताब्यात घेऊ"

सोप्या शब्दात सांगायचे तर, आर्मीच्या कायद्यानुसार तो एक पळपुटा किंवा 'भगोडा' शिपाई होता! आता त्याची रीतसर चौकशी होऊन त्याच्यावर यथोचित कायदेशीर कारवाई होणार केली जाणार होती!

ती तार वाचून युनिटमधील आम्हा सर्वच अधिकाऱ्यांना धक्का बसला. आमचे CO, लेफ्ट. कर्नल सहस्रबुद्धे तर माझ्यावरच भडकले. त्यांना न विचारता, न सांगता, मी अश्या प्रकारचे पाऊल का आणि कसे उचलले याबद्दल CO साहेबांनी मला जाब विचारला. 
"सर, EME सेंटरकडे चौकशी करण्याची सणक सहजच माझ्या डोक्यात आली. तोपर्यंत तुम्ही ऑफिसमधून निघूनही गेला होतात. परंतु, तुम्ही दिलेली शिकवण माझ्या चांगली लक्षात होती की, 'कोणत्याही कागदावर डोळे झाकून सही करू नये'." 

माझे उत्तर CO साहेबांना नक्कीच आवडले असावे. कारण ते एकदम शांत झाले आणि त्यांनी आमच्या युनिटचे 2IC, मेजर कृष्णा आणि बॅटरी कमांडर, मेजर (पुढे निवृत्त मेजर जनरल) महंती या दोघांनाही बोलावून घेतले. आम्हा सर्वांच्या विचार-विनिमयानंतर, एकमताने असे ठरले की, आम्हाला मिळालेल्या माहितीबद्दल टेल्कोच्या अधिकाऱ्यांना, अगदी निवृत्त कर्नल ब्रार यांनाही, सध्या काहीच कळवायचे नाही. महिन्याभराने सामान घेण्यासाठी गुरबचन सिंग पुन्हा येईल त्यावेळी सापळा लावून त्याला पकडण्याचे आम्ही ठरवले.  
 
पुढच्या महिन्यात, नेहमीप्रमाणे गुरबचन सिंग युनिटमध्ये आला. रेशन व दारूचा कोटा घेतल्यानंतर तो माझ्याकडे आला तेंव्हा, EME सेंटरकडून समजलेल्या माहितीसंबंधी मी त्याला सांगितले. प्रथम त्याने साफ कानावर हात ठेवले. खरा 'भगोडा' तो स्वतः नसून, त्याचा जुळा भाऊ असल्याचा बनावही त्याने केला. गुरबचन सिंगचे बोलणे ऐकल्यानंतर, आमच्या रेजिमेंटचे सुभेदार मेजर आणि हवालदार मेजर त्याला घेऊन काही काळ ऑफिसबाहेर गेले. त्या दोघांनी त्याला खास 'मिलिटरी खाक्या'चा एक डोस दिला असणार. थोड्याच वेळात माझ्या ऑफिसात येऊन गुरबचन सिंगने, तो स्वतःच 'भगोडा' असल्याची कबुली दिली. 

लगेच, मेजर महंती यांनी माझ्यासह बसून, गुरबचन सिंगची चौकशी सुरु केली. त्याची इत्थंभूत कहाणी ऐकायला, आम्हा दोघांव्यतिरिक्त, CO साहेब व इतर अधिकारीही हजर होते. त्याने दिलेल्या जबानीप्रमाणे, २१ ऑक्टोबर १९६२ रोजी अचानक चिनी हल्ला येताच, आपल्या सैन्याच्या सर्व तुकड्या इतस्ततः पांगल्या. ज्याने-त्याने आपापल्यापुरते पाहावे अशी स्थिती होती. तश्या विचित्र परिस्थितीत, गुरबचन सिंग कसाबसा जीव वाचवून, प्रथम भूतानमध्ये पळाला आणि नंतर कलकत्त्यात पोहोचला. खोटे नाव धारण करून त्याने एका ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये नोकरी केली. आधी ट्रकचा क्लीनर, आणि नंतर ड्रायव्हर म्हणून, १९६३ ते १९६७ या काळात त्याने कलकत्ता-मुंबई मार्गावर अनेक फेऱ्या केल्या. अश्याच एका फेरीत, तो जमशेदपूर येथे थांबलेला असताना, त्याच्या एका मित्राने, टेल्कोमध्ये त्याची वर्णी लावून दिली. अत्यंत निष्ठेने आणि उत्तम काम करीत असल्याने १९६८ पासून तो तेथेच नोकरीवर टिकला होता. मात्र, पाच वर्षांनंतर त्याच्या सर्व्हिस बुकाची पडताळणी करणे आवश्यक झाल्याने तो माझ्यापर्यंत पोहोचला होता.  

ही संपूर्ण कहाणी ऐकून, निवृत्त कर्नल ब्रार आणि टेल्कोचे इतर सर्व वरिष्ठ अधिकारी अक्षरशः स्तिमित झाले.   

गुरबचन सिंगला आर्मीच्या पद्धतीप्रमाणे रीतसर अटक झाली आणि EME सेंटरमधून आलेल्या आरक्षी दलासोबत त्याची त्रिमुलगेरीला रवानगी झाली. तेथे आर्मी कोर्टासमोर चाललेल्या खटल्यात त्याला १८ महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली गेल्याचे समजले. 

इकडे माझ्या कानात मात्र, अनेक अधिकाऱ्यांनी धोक्याची घंटा वाजवली. गुरबचन सिंग 'भगोडा' असल्याची वस्तुस्थिती प्रथमतः मीच उघडकीला आणली होती. त्यामुळे, एखाद्या हस्तकाकरवी, अथवा तुरुंगातून सुटल्यावर स्वतःच, गुरबचन सिंग माझ्यावर निश्चित सूड उगवणार हे भाकीत अनेकांनी वर्तवले. मी जेमतेम २३ वर्षांचा आणि अननुभवी अधिकारी होतो. मला भीती वाटणे स्वाभाविक होते. अविचाराने, आणि निष्कारणच आपण या फंदात पडलो असेही मला वाटू लागले. शेवटी, 'जे जे होईल ते ते पाहावे' असे स्वतःशी म्हणून, मी ते सर्व विचार बाजूला सारले. 

या घटनेपाठोपाठ आमच्या CO साहेबांनी, म्हणजेच लेफ्ट. कर्नल सहस्रबुद्धेंनी, गुरबचन सिंग ज्यांचा ड्रायव्हर होता त्या कर्नल ब्रार यांना विनंती करून, त्यांच्यापाशी काही मागण्या केल्या. पहिली मागणी अशी की, शिक्षा संपताच गुरबचन सिंगला पुन्हा टेल्कोमध्ये कामावर रुजू करून घेतले जावे. दुसरे असे की, गुरबचन सिंगची पत्नी आणि मुलांना सध्या टेल्कोच्या आवारातील घरातच राहू द्यावे, त्याच्या मुलांना टेल्कोच्या शाळेतच शिकू द्यावे, आणि टेल्कोतर्फे त्यांना घरखर्चासाठी दरमहा थोडासा भत्ताही दिला जावा. 

CO साहेबांच्या विनंतीला मान देऊन, कर्नल ब्रार यांनी, या सर्व गोष्टी अंमलात आणण्यासाठी पुढाकार घेतला. टेल्कोच्या वाहन परीक्षण विभागाचे प्रमुख, निवृत्त मेजर डी. एन. अगरवाल यांचीही या कामी अतिशय मोलाची मदत झाली. मुख्य म्हणजे, चीन युद्धामुळे उद्भवलेल्या विचित्र परिस्थितीचा बळी झालेल्या एक माजी सैनिकाचा, सहानुभूतीपूर्वक विचार केला गेला! एखाद्या कर्मचाऱ्याचे हित जपण्याचे टाटा समूहाचे धोरण आणि एकंदर उदार मनोवृत्ती, याचे हे द्योतकच मानले पाहिजे!

त्याउपर, CO साहेबांनी आम्हाला आदेश दिला की, गुरबचन सिंगच्या परिवाराला दरमहा रेशन आणि जीवनावश्यक वस्तू आमच्या रेजिमेंटच्या कॅन्टीनमधून घरपोच दिल्या जाव्यात. अर्थातच, CO साहेबांच्या या आदेशाची कसून अंमलबजावणी करण्यात मी कमी पडलो नाही. या घटनेनंतर लगेच, म्हणजे ऑक्टोबर १९७३ मध्ये लेफ्ट. कर्नल सहस्रबुद्धेंची आमच्या युनिटमधून दुसरीकडे बदली झाली. पण, त्यांच्या जागी आलेल्या, लेफ्ट. कर्नल एस. के. अब्रोल या नवीन CO साहेबांनीही या आदेशात काडीचाही बदल केला नाही. ज्या पद्धतीने आम्ही हे संपूर्ण प्रकरण हाताळले त्याबद्दल टेल्को आणि टिस्कोच्या अधिकाऱ्यांनीही आमचे वारेमाप कौतुक केले. 

१९७४-७५ मध्ये केंव्हातरी, सक्तमजुरीची शिक्षा भोगून गुरबचन सिंग जमशेदपूरला परतला. मी अजूनही आमच्या युनिटचा Adjutant  होतो, आणि अविवाहित असल्याने ऑफिसर्स मेसमधील एका खोलीत राहत होतो. गुरबचन सिंग परतल्याची आणि तो लगोलग मला भेटायला येत असल्याची खबर, निवृत्त कर्नल ब्रार यांच्याकडून समजताच मी तयारीला लागलो. गुरबचन सिंग व त्याच्या पत्नीसाठी चहा-नाश्ता आणि मुलांसाठी चॉकलेट मागवून मी एक छोटेखानी मेजवानीच आयोजित केली. आल्या-आल्या गुरबचन सिंग अक्षरशः माझ्या पायावर कोसळला आणि मनसोक्त रडला. मलाही माझ्या भावना काबूत ठेवणे अवघड झाले.
 
या सर्व प्रकरणात, लेफ्ट. कर्नल सहस्रबुद्धे आणि टाटा समूहाचे कर्नल ब्रार व मेजर अगरवाल यांच्याकडून मी नकळतच एक मोलाचा धडा शिकलो. कायदा व नियमांच्या चौकटीत राहूनच, पण सहानुभूति आणि माणुसकी न विसरता आपण काम केले, तर अक्षरशः जादूची कांडी फिरल्यागत अकल्पित परिणाम साधता येतो.    

गुरबचन सिंगने कर्नल सहस्रबुद्धेंचे आणि माझे शतशः आभार मानले. त्याने मला प्रांजळपणाने सांगितले की, त्याला पकडून देण्यास जरी मी जबाबदार होतो तरीही, ११ वर्षे त्याच्या मनात डाचत असलेल्या अपराधी भावनेचा निचरा होण्यासाठीही मीच कारणीभूत झालो होतो. त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण आनंद झळकत होता. मुख्य म्हणजे, शिक्षा भोगून दोषमुक्त झाल्यावर, तो आता स्वच्छंदपणे आपले आयुष्य जगू शकणार होता! 

मूळ इंग्रजी अनुभव लेखन:
ब्रिगेडियर अजित आपटे (सेवानिवृत्त)
मराठी भावनुवाद: 
कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)
९४२२८७०२९४ 

Thursday 6 August 2020

वाहे गुरू दा खालसा...

गेल्या नोव्हेंबरमध्ये मी देहरादूनहून चंडीगढला कार चालवत निघालो होतो. हा चार तासांचा प्रवास माझ्यासाठी नेहमीच एक सुखद अनुभव असतो.