Wednesday 2 February 2022

२६ जानेवारी २०२२ आणि बदललेले काश्मीर

यंदा प्रजासत्ताक दिनी काश्मीर जरासे वेगळे भासले. दोन लक्षवेधी व्हिडिओमध्ये काश्मीर खोऱ्यातील बदललेले वातावरण दिसून आले.

मेहबूबा मुफ्ती, फारूक आणि ओमर अब्दुल्ला यांची निवासस्थाने असलेल्या, श्रीनगरमधील गुपकर रस्त्यावर ३० फूट तिरंगा हातांत घेऊन अभिमानाने चालणारा तरुणांचा गट एका व्हिडिओमध्ये दिसला. 

मेहबूबा यांनी ऑक्टोबर २०२० मध्ये सांगितले होते की कलम ३७० पुन्हा लागू केल्याशिवाय काश्मीरमध्ये तिरंगा फडकवला जाणार नाही. मेहबूबा यांच्या या विधानामुळे त्यांच्या पक्षातील अनेक सदस्यांनी राजीनामाही दिला होता. तेव्हापासून सातत्याने मेहबूबा केंद्र सरकारला धमक्या देत आहेत. 

स्थानिक तरुणांनी मेहबूबा यांना दिलेला हा जणू एक संदेशच होता की, काश्मीरी तरुण भारताचा राष्ट्रीय ध्वज घेऊन प्रगतीपथावर निघाले आहेत, आणि काश्मीर राज्याची लूट करणाऱ्या जुन्या कारभाऱ्यांची हुकूमशाही आता चालणार नाही.

साजिद युसूफ शाह, साहिल बशीर भट हे कार्यकर्ते त्यांच्या डझनभर समर्थकांसह श्रीनगरच्या क्लॉक टॉवरवर ध्वजारोहणाचे आयोजन करताना दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिसले. त्यासाठी त्यांना हायड्रॉलिक लिफ्टची मदत घ्यावी लागली. राष्ट्रगीत गायन, आणि काश्मीर मार्शल आर्ट्स अकादमीच्या प्रात्यक्षिकांसह स्थानिक लोकांच्या उपस्थितीत हा ध्वजारोहण समारंभ साजरा झाला. यापूर्वी क्लॉक टॉवरवर तिरंगा फडकला होता १९९५ मध्ये!

क्लॉक टॉवरचे छत कमकुवत असल्याने, क्लॉक टॉवरवर सूर्यास्तानंतर चढणे धोकादायक ठरले असते. त्यामुळे, संध्याकाळ होण्याआधीच ध्वज क्लॉकटॉवरवरून उरवण्यात आला. यावरही, ओमर अब्दुल्ला यांनी उपरोधिक टिप्पणी करण्याची संधी सोडली नाही. ते म्हणाले, “झेंडा संध्याकाळपर्यंत तरी फडकत ठेवायला हवा होता”.

काश्मीरमधून आलेल्या अधिकृत अहवालात असेही म्हटले आहे की राज्यातील सार्वजनिक उद्यानांसह अनेक ठिकाणी, हजारो राष्ट्रध्वज फडकताना दिसले. श्रीनगरमध्ये मोठ्या संख्येने राष्ट्रध्वज फडकण्याची ही पहिलीच वेळ असल्याचेही अहवालात म्हटले आहे.
 
शोपियाँ येथील आर्मी गुडविल स्कूलच्या आवारात १५० फुटी ध्वजस्तंभाचे उद्घाटन करण्यात आले. काही काळापूर्वी दहशतवाद्यांचे प्रमुख केंद्र असलेले शोपियान गाव आता काश्मीर खोऱ्यातील महत्त्वाचे व्यापारी केंद्र बनले आहे.
 
कोव्हिडच्या साथीमुळे शैक्षणिक संस्थांनी मात्र हा कार्यक्रम गेल्या वर्षीच्या स्वातंत्र्य दिनाप्रमाणेच कर्मचाऱ्यांपुरता मर्यादित ठेवला.

सुरक्षा दलांनी ठार केलेल्या बुरहान वानी या दहशतवाद्याचे वडील, मुझफ्फर वानी यांनी, पुलवामा जिल्ह्यातील त्राल गावामध्ये, मुलींच्या उच्च माध्यमिक सरकारी विद्यालयात  ध्वजारोहण केले.

कुपवाडा येथे मार्शल आर्ट्सच्या प्रदर्शनाचा समावेश असलेल्या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती. पुंछ आणि राजौरी सेक्टरमधूनही असेच वृत्त आले. 

एकूणच राज्यभरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. खोऱ्यात शांतता होती, कोणतीही अनुचित घटना घडली नाही किंवा बहिष्काराचे कोणतेही आवाहन करण्यात आले नाही. राज्यात कुठेही पाकिस्तानचे झेंडे फडकले नाहीत.

खबरदारीची उपाययोजना म्हणून २६ जानेवारी रोजी सकाळी मोबाईल इंटरनेट सेवा काही तासांसाठी बंद करण्यात आली होती.  मात्र, फोन सेवा आणि लँड लाईनद्वारे इंटरनेट सेवा सुरू ठेवली गेली.

दरम्यान, पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली. समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आणि राजकीय कार्यकर्त्यांचाही त्यात सहभाग होता. आंदोलकांनी स्वयंनिर्णयाच्या अधिकाराची मागणी केली आणि पाक सरकारकडून सातत्याने होत असलेल्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाचा निषेध केला. यावेळी काही स्थानिक राजकारण्यांची भाषणेदेखील झाली.

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात विघ्न आणण्यासाठी पाकिस्तानने Sikhs for Justice (SFJ) च्या सदस्यांना उकसवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. प्रजासत्ताक दिनापूर्वी प्रसिद्ध झालेल्या एका व्हिडिओमध्ये, SFJ चे संस्थापक, गुरपतवंत सिंग पन्नू आणि एका महिला वक्त्यांनी काश्मीरमधील तरुणांना हिंसाचारासाठी उद्युक्त करण्याचा प्रयत्न केला होता. पन्नू म्हणाले, "काश्मीरच्या लोकांनो, दिल्ली गाठा. पंतप्रधान मोदींना तिरंगा फडकवण्यापासून रोखा. बारामुल्ला,शोपियाँ, अनंतनाग येथे दररोज खोट्या चकमकीत तुमचे भाऊबंद मारले जात आहेत. जगात कोणालाच त्याची माहितीही नाही. २६ जानेवारीला तुम्ही दिल्लीला पोहोचलात तर संपूर्ण जगाला हे समजेल की काश्मीरी आणि शीख लोकांना भारतपासून स्वातंत्र्य हवे आहे."

या चिथावणीला हिजबुल मुजाहिदीनचाही पाठिंबा होता. या चिथावणीवर काश्मीरमधून उलटसुलट प्रतिक्रिया आल्या. पण प्रत्यक्षात काहीच घडले नाही.

काश्मीरच्या कोणत्याही राजकीय नेत्यांनी मात्र त्यांच्या पक्षांच्या कार्यालयात ध्वजारोहणाचे आयोजन केले नाही. त्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्राला शुभेच्छाही दिल्या नाहीत. उलट, कलम ३७० हटवल्याबद्दल त्यांनी केंद्र सरकारविरोधात संताप व्यक्त केला. ज्या संविधानाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेऊन हे राजकीय पुढारी आपापल्या पदांवर विराजमान आहेत ते संविधान लागू होण्याचा दिवस म्हणजेच हा प्रजासत्ताक दिन आहे याचा त्या राजकीय नेत्यांना सोयीस्करपणे विसर पडलेला दिसतो. तथापि, त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी खोऱ्यातील विविध भागात आयोजित झालेल्या कार्यक्रमात भाग घेतला. 

पाकिस्तानला काश्मीरात शांतता नकोच आहे. काश्मीरच्या मुद्द्याला प्रसिद्धीझोतात ठेवण्यासाठी त्यांनी यंदाही हिंसाचार भडकवण्याचा प्रयत्न केला. पण ज्या उत्साहाने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले त्यामुळे पाकिस्तानला चांगलीच चपराक बसली. ‘बंद’ किंवा बहिष्काराचे आवाहन कोणीच न केल्यामुळे भारतातील पाकसमर्थक लॉबीने या प्रदेशावरील पकड गमावली असल्याचे दिसून आले आहे.

हे तेच काश्मीर आहे जिथे काही वर्षांपूर्वी भारताचा झेंडा पायदळी तुडवण्यात आला होता. यंदा मात्र तो सर्वत्र दिमाखात फडकला.

हे सत्य नक्कीच पाकिस्तानच्या जिव्हारी झोंबणार आहे. काश्मीरच्या जनतेने दाखवलेले हे सकारात्मक चित्र जगापुढे आलेले पाकला खपणार नाही. नजीकच्या भविष्यात अधिक संख्येने दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा प्रयत्न पाक  नक्कीच करणार.

या पार्श्वभूमीवर, भारतीय सुरक्षा दलांना अजिबात गाफील राहून चालणार नाही. पाकच्या नापाक कारवायांना आळा घालण्यासाठी आणि स्थानिक जनतेसोबत आपुलकी जपण्यासाठी त्यांनी सदैव कटिबद्ध राहणे अत्यावश्यक आहे.
_________________________

मूळ इंग्रजी लेखक : मेजर जनरल हर्ष कक्कर (सेवानिवृत्त) 

स्वैर मराठी रूपांतर: कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

18 comments:

  1. काश्मीर भारताच्या मुख्य प्रवाहात हळू हळू येत आहे हे खूपच आशादायी चित्र आहे.

    ReplyDelete
  2. Most appropriate.. Some day Kashmiris will realise their worth & join the main stream .. Col Pandit

    ReplyDelete
  3. Unless pok doesn't come under Indian Control the integration won't be completed

    ReplyDelete
    Replies
    1. Totally agree.
      My dream is, that day may not be very far. 🙏

      Delete
  4. Gm sir, nicely written, worth reading. Thanks

    ReplyDelete
  5. बदलाचे वारे कोणत्या दिशेनं वहात आहेत... याची प्रचिती येत आहे... मस्त... खूपच आशादायी चित्रं

    ReplyDelete
  6. केलेली आशा प्रत्यक्षात रूपांतरित होत आहे.
    खुप छान!
    Dear Anand very nicely written/translated.
    Ravindra Saraf

    ReplyDelete
  7. वाचून खूप आनंद झालाय. आनंद अशासाठी की शांतता आणि सुबत्ता नांदत आहे.

    ReplyDelete
  8. Quite an eye opener and the common man has seen through the game of NC and PDP leaders. Thumbs up for removing 370

    ReplyDelete
  9. This is just a beginning, lot of work to do for Akhand Bharat, hence we require Modiji, Amit shahaji and like minded Rashrabhakt in power. This is main duty of we Bhartiya now

    ReplyDelete